हिंदु हिताचे कायदे निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – सतीश कल्याणकर, माजी सदस्य, सेन्सॉर बोर्ड

संभाजीनगर येथे प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ३१ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग

संभाजीनगर, ७ मे (वार्ता.) – चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक हिंदूंना वाईट प्रवृत्तीचे दाखवण्यात येत असून अहिंदूंची प्रतिमा उंचावण्याचे षड्यंत्र सध्या चालू आहे. कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये भारतभरातून अभिनेत्री बनण्यासाठी चित्रपटसृष्टीमध्ये आलेल्या १ सहस्र २०० मुली अनैतिक मार्गाला लागल्या आहेत, तर त्यातील ४५० हून अधिक मुली बेपत्ता आहेत. हिंदूंनी संघटितपणे हिंदु राष्ट्राची मागणी केल्यास निश्चितपणे हिंदु राष्ट्र येईल, असे प्रतिपादन सेन्सॉर बोर्डाचे माजी सदस्य श्री. सतीश कल्याणकर यांनी केले. नुकतेच येथील सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. या अधिवेशनाला नगर येथील व्यापारी महासंघ, वंदे मातरम् ग्रुप, शिव प्रहार प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारतीय छावा संघटना यांसारख्या ३१ हून अधिक संघटनांचे १०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

शंखनाद, दीपप्रज्वलन आणि वेदमंत्र पठणाच्या उद्घोषात या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला प्रारंभ झाला. अधिवेशनामध्ये सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शारीरिक बळासमवेत साधना करणे आवश्यक आहे’’, तर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, प्रत्येक समस्येचा उपाय ‘हिंदु राष्ट्र’ असून सर्व संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना एका धाग्यात गुंफण्याचे काम हिंदु राष्ट्र करत आहे.

सरकारीकरण झालेल्या अनेक मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदू विधीज्ञ परिषद

मंदिर सरकारीकरण झालेल्या अनेक मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार हिंदु विधीज्ञ परिषदेने माहितीच्या अधिकाराखाली उजेडात आणला आहे. या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अनेक उच्चस्तरीय अधिकार्‍यांची चौकशीही चालू आहे.

विशेष

१. ‘लव्ह जिहादच्या विरोधातील यशस्वी लढा’ याविषयी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणासाठी सध्या कार्यरत असलेल्या शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख श्री. सुरज आगे यांनी मनोगत मांडले.

२. नगर येथील व्यापारी महासंघाचे श्री. ईश्वर बोरा आणि श्री. प्रतीक बोगावत यांनी अतिक्रमणाच्या विरोधात नगर येथील व्यापार्‍यांनी दिलेल्या यशस्वी लढ्याचे स्वरूप सांगितले. ‘मागील वर्षभरामध्ये एका हिंदु व्यापार्‍याला धर्मांधांनी केलेल्या मारहाणीनंतर नगर मधील सर्व व्यापारी संघटना एकत्रित आल्या आणि त्यांनी संघटितपणे अतिक्रमणाला सनदशीर मार्गाने विरोध केला. त्यामुळे सध्या कापड बाजारातील अतिक्रमण पूर्णपणे थांबलेले आहे’, असे त्यांनी या वेळी सांगितले.

३. नगर शहरातील २० वेगवेगळी लँड जिहादची प्रकरणे हाताळणारे आणि चिकाटीने प्रयत्न करून त्यातील काही प्रकरणांमध्ये कायदेशीर मार्गाने लढा देऊन यश मिळवणारे श्री. अमोल शिंदे यांनी या वेळेस ‘लँड जिहाद’ची भयानकता स्पष्ट केली.