स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कविता म्हटली; म्हणून हृदयनाथ मंगेशकर यांना काँग्रेसने आकाशवाणीतील चाकरीतून काढले ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

(डावीकडून) नरेंद्र मोदी, हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर

‘लता मंगेशकर यांचे कुटुंब गोव्याचे आहे. त्यांच्या कुटुंबाला कशी वागणूक देण्यात आली, ते देशाला कळायला हवे. लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना ‘ऑल इंडिया रेडिओ’ने (आकाशवाणीने) चाकरीतून काढले होते. त्यांचा गुन्हा इतकाच होता की, त्यांनी सावरकर यांच्यावरील कविता आकाशवाणीवर सादर केली होती. आकाशवाणीवर ही कविता सादर करण्यापूर्वी हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेतली होती. त्या वेळी ‘माझी कविता आकाशवाणीवर सादर करून तुम्हाला कारागृहात जायचे आहे का ?’, असा प्रश्न सावरकर यांनी त्यांना विचारला होता. हृदयनाथ मंगेशकरांनी या घटनेचा उल्लेख एका मुलाखतीत केला होता. हृदयनाथ यांनी सावरकर यांची कविता आकाशवाणीवर सादर केल्यानंतर पुढील ८ दिवसांत त्यांना कामावरून काढण्यात आले’, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारी २०२२ या मासात गोव्यात झालेल्या एका सभेत दिली.