Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !

राष्ट्रीय युद्ध स्मारकात त्यांना सन्मान !

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे ‘नॅशनल वॉर मेमोरियल’च्या संकेतस्थळावर प्रथमच उपलब्ध !

नवी देहली – एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या पहलगाममधील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने १५ दिवसांतच मे महिन्यात एतिहासिक ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानवर सूड उगवला होता. त्यामध्ये भारताच्या ६ सैनिकांना वीरमरण आल्याचे भारताने प्रथमच जाहीर केले आहे. त्यांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या (‘नॅशनल वॉर मेमोरियल’च्या) संकेतस्थळावर देण्यात आली आहेत. या संकेतस्थळावर भारतासाठी कोणत्याही युद्धात किंवा मोहिमेत सहभागी होऊन हुतात्मा झालेल्यांची नावे नोंदवली जातात.

या ६ सैनिकांना आले होते वीरमरण !

सुभेदार मेजर पवन कुमार (मुख्यालय १० इन्फैंट्री ब्रिगेड)
रायफलमॅन सुनील कुमार (वीर चक्र – ४ जम्मू-कश्मीर लाइट इन्फैंट्री)
लान्स नायक दिनेश कुमार (५ फील्ड रेजिमेंट)
एविएशन टेक्नीशियन मूड मुरली नायक (८५१ लाइट रेजिमेंट)
हवालदार सुनील कुमार सिंह (२३७ फील्ड वर्कशॉप कंपनी)
सुरेंद्र कुमार (वायु सेना पदक ३९ विंग)

ही नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या संकेतस्थळावरील ‘रोल ऑफ ऑनर’ (सन्मान सूची) विभागात दिसतात. या सूचीत एकूण २६ सहस्र ६२६ हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत. या सूचीत वर्ष १९४७-४८ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धापासून ते ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी असलेल्या सैनिकांचा समावेश आहे.