महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !

  • मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

  • मालवणमध्ये ‘मालवणी भवन’ उभारणार !

मंत्री उदय सामंत

मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूर या ८ शहरांमध्ये सुसज्ज अन् अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्रे उभारण्यात येणार आहेत. मराठी भाषा विकास केंद्रे राज्यातील ८ प्रमुख शहरांमध्ये पुढील वर्षभरात उभारली जाणार आहेत. यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे ‘मालवणी भवन’ उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मराठी भाषा तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत करून कोकणवासियांच्या वतीने मंत्री सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत.

मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिलेली माहिती

१. पुढील २ महिन्यांत मराठी भाषेच्या ‘अभिजात’ दर्जाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. मराठीच्या जागतिक प्रसारासाठी लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ‘मराठी भाषा वैश्विक केंद्र’ चालू करण्यात येणार आहे.

२. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र ‘मराठी भाषा अधिकारी’ नियुक्त केला जाईल. या अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था केली जाणार आहे. हे जिल्हास्तरीय मराठी भाषा अधिकारी स्थानिक पातळीवरील मराठी भाषाविषयक विविध समित्यांचे कामकाज प्रभावीपणे राबवण्याचे काम करतील.

३. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमधील मराठी फलक, नामफलक आणि सूचनाफलक मराठीतच असावेत, याच्या कठोर कार्यवाहीसाठी लवकरच सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.