‘व्हॅलेंटाईन डे’ची कुप्रथा रोखण्यासाठी युवा पिढीला धर्मशिक्षण दिले पाहिजे ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘व्हॅलेंटाईन डे’ची विकृती सोडा : भारतीय संस्कृती अंगीकारा !’, या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !

मुंबई – ज्या ‘व्हॅलेंटाईन’च्या नावे हा दिवस साजरा केला जातो, त्या कथित ‘संत व्हॅलेंटाईन’च्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नसल्याने वर्ष १९६९ मध्ये ‘रोमन कॅथॉलिक चर्च’ने त्यांच्या संतांच्या दिनदर्शिकेतून व्हॅलेंटाईनचे नाव वगळले. रशियातील बेलग्रेड, अमेरिकेतील फ्लोरिडा विश्वविद्यालय, चीन, इटली, स्वीडन, दक्षिण कोरिया, इथियोपिया आदी देशांत हा दिवस साजरा केला जात नाही; मग भारतातच ‘व्हॅलेंटाईन डे’ कशासाठी ? केवळ युवकांना आकर्षित करत विविध आस्थापने स्वत:चा गल्ला भरत आहेत.

श्री. हर्षद खानविलकर

या विरोधात हिंदूंनी शाळा-महाविद्यालयांत जाऊन युवकांचे प्रबोधन केले पाहिजे आणि वैध मार्गाने विरोध केला पाहिजे. ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या कुप्रथा रोखण्यासाठी आपल्या युवा पिढीला धर्मशिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने १२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी आयोजित केलेल्या ‘व्हॅलेंटाईन डे’ची विकृती सोडा : भारतीय संस्कृती अंगीकारा !’, या ‘विशेष संवादा’त ते बोलत होते.

या वेळी बेंगळुरू (कर्नाटक) येथील व्यावसायिक श्री. स्वदेश प्रशांत, उत्तरप्रदेश येथील ‘सनातन एकता मिशन’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अशोक पाठक आणि भाजपचे चाळीसगाव येथील तालुका अध्यक्ष श्री. सुनील निकम आदी सहभागी झाले होते.

‘डे’ संस्कृतीमुळे युवकांमध्ये शारीरिक आणि मानसिक विकृती निर्माण होत आहे ! – अशोक पाठक, राष्ट्रीय अध्यक्ष, सनातन एकता मिशन, उत्तरप्रदेश

श्री. अशोक पाठक

हिंदु संस्कृती केवळ मानवावरच नव्हे, तर सर्वांवर प्रेम करण्यास शिकवते; मात्र तिचा अभ्यास नसल्यामुळे ‘डे’ संस्कृती ‘एन्जॉय’ (मजा) करण्याच्या मागे लागलेला आजचा युवावर्ग हा शिक्षण अन् ब्रह्मचर्य सोडून भ्रामक प्रेमाच्या मागे पळत सुटला आहे. त्यामुळे त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक विकृती निर्माण होऊन त्यांचे आयुष्य वाया जात आहे. मुख्यत: मिशनरी शाळांतून पद्धतशीरपणे हिंदु संस्कार नष्ट केले जात आहेत.


हे पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित : ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ में “छोडो वैलेंटाइन डे की विकृति : अपनाओ भारतीय संस्कृति !”

 

___________________

विविध ‘डे’च्या माध्यमातून देशाला लुटण्यासह भारतियांचे धर्मांतर करण्याचेही षड्यंत्र चालू आहे ! – स्वदेश प्रशांत, व्यावसायिक, बेंगळुरू, कर्नाटक

श्री. स्वदेश प्रशांत

७ फेब्रुवारीपासून ते १४ फेब्रुवारीपर्यंत भारतीय युवा पिढीला ‘रोज डे’ (गुलाब देण्याचा दिवस), ‘फ्रेंडशिप डे’ (मैत्री दिवस), ‘व्हॅलेंटाईन डे’ आदी पाश्चात्त्य ‘डे’ साजरे करण्यास भाग पाडण्यामागे आर्थिक लूट करण्याचे आंतरराष्ट्रीय आस्थापनांचे मोठे षड्यंत्र आहे. यात शुभेच्छापत्रे, भेटवस्तू, चॉकलेट आदी बनवणार्‍या अनेक विदेशी आस्थापनांचा सहभाग असतो. या आस्थापनांकडून युवावर्गात ‘डे’ संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे. पाश्चात्त्य ‘डे’च्या माध्यमांतून कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय केला जातो. हे आता केवळ काही ‘डे’पुरते मर्यादित राहिले नसून हिंदूंच्या दिवाळी आणि अन्य सणाला ‘पारंपरिक भारतीय मिठाईऐवजी नातेवाईक अन् मित्र परिवाराला ‘कॅडबरी’ भेट द्या’, अशी विज्ञापने करून मोठी आर्थिक लूट केली जात आहे. यात आर्थिक लुटीसह भारतियांचे धर्मांतर करण्याचेही षड्यंत्र चालू आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन ! – सुनील निकम, भाजप तालुका अध्यक्ष, चाळीसगाव, जळगाव

श्री. सुनील निकम

‘व्हॅलेंटाईन डे’ ही विकृतीच असून त्यामुळे युवक-युवतींचे जीवन धोक्यात आले आहे. या पाश्चात्त्य ‘डे’मधून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन मिळत असून काही धर्मांध संघटना जाणीवपूर्वक तो पसरवत आहेत. या विरोधात हिंदूनी जागृत झाले पाहिजे आणि ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत.