शृंगेरी पिठामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश केल्यावर त्यांना तांब्याचे आणि विद्यार्थ्यांनी ‘घनपाठी’ ही पदवी प्राप्त केल्यावर त्यांना सोन्याचे कडे त्यांच्या उजव्या हातात घालण्यास देण्यामागील अध्यात्मशास्त्र !

अनुक्रमणिका

१. शृंगेरी पिठामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश केल्यावर त्यांना त्यांच्या उजव्या हातात तांब्याचे कडे धारण करण्यासाठी दिल्यामुळे त्यांच्या सूक्ष्म देहांतील रज-तम गुणांचे प्रमाण न्यून होऊन सत्त्व गुण वाढू लागणे आणि त्यांची सुप्तावस्थेत असणारी प्रतिभा जागृत होणे

२. शृंगेरी पिठातील विद्यार्थ्यांनी ‘घनपाठी’ ही पदवी प्राप्त केल्यावर त्यांना त्यांच्या उजव्या हातात सोन्याच्या धातूचे कडे धारण करण्यास दिल्यामुळे होणारी आध्यात्मिक स्तरावरील प्रक्रिया आणि लाभ

२ अ. घनपाठी विद्यार्थ्यांची सूर्यनाडी सतत कार्यरत झाल्यामुळे त्यांच्याकडे असणारे वेदमंत्र आणि वैदिक शब्द रूपी वैदिक ज्ञानाचे रूपांतर तेजतत्त्वामध्ये होऊन वातावरणात तेजोमय ज्ञानलहरींचे प्रक्षेपण होणे

२ आ. विद्यार्थ्यांनी त्यांच्या उजव्या हातात सोन्याचे कडे धारण केल्यामुळे त्यांच्या मेधावी बुद्धीचे रूपांतर देवगुरु बृहस्पतींच्या ज्योत्स्नास्वरूप दैवी बुद्धीमध्ये होणे आणि त्यांच्यामध्ये ब्राह्मतेज सतत जागृत रहाणे

२ इ. घनपाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृत झालेल्या ब्राह्मतेजाच्या माध्यमातून सरस्वतीदेवीची ज्ञानशक्ती घनपाठी विद्यार्थ्याच्या वाणीवर ‘वाक्देवी’ आणि बुद्धीमध्ये ‘ज्योत्स्ना’ या रूपाने कायमस्वरूपी कार्यरत होणे

३. वेदांचे मंत्र आणि वेदांचे ज्ञान यांच्यातील भेद

परात्पर गुरु डॉ. आठवले

ज्ञानप्राप्तकर्ती साधिका – कु. मधुरा भोसले

‘आदि शंकराचार्य यांनी ८ व्या शतकात भारतात धर्मसंस्थापना करण्यासाठी भारताच्या ४ दिशांना ४ धर्मपिठांची स्थापना केली. पूर्व दिशेला ओडिशामध्ये पुरी गोवर्धन पीठ, पश्चिम दिशेला गुजरामध्ये ‘द्वारकापीठ शारदा पीठ’, उत्तरेला ‘बद्री ज्योतिषपीठ’ आणि दक्षिणेला चिक्कमंगळुरू येथे ‘शृंगेरी शारदापीठ’ या धर्मपिठांची स्थापना केली. हे ४ धर्मपीठ असण्यासह ज्ञानपीठही आहेत. या पिठांमध्ये धर्म आणि अध्यात्म यांचे ज्ञान दिले जाते. त्यामुळे या धर्मपिठांना ज्ञानार्जन करणारे ‘ज्ञानपीठ’ असेही संबोधले जाते. ‘शृंगेरी पिठामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उजव्या हातात घालण्यासाठी तांब्याच्या धातूचे कडे दिले जाते. जेव्हा या पिठातील विद्यार्थी ‘घनपाठी’ ही पदवी प्राप्त करतो, तेव्हा त्याच्या उजव्या हातात घालण्यासाठी त्याला सोन्याच्या धातूचे कडे दिले जाते. यामागील अध्यात्मशास्त्र पुढील प्रमाणे आहे.

शृंगेरी पीठ

१. शृंगेरी पिठामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश केल्यावर त्यांना त्यांच्या उजव्या हातात तांब्याचे कडे धारण करण्यासाठी दिल्यामुळे त्यांच्या सूक्ष्म देहांतील रज-तम गुणांचे प्रमाण न्यून होऊन सत्त्व गुण वाढू लागणे आणि त्यांची सुप्तावस्थेत असणारी प्रतिभा जागृत होणे

शृंगेरी पिठामध्ये जेव्हा विद्यार्थी प्रवेश करतात, तेव्हा ‘त्यांची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढावी’, यासाठी त्यांना तांब्याचे कडे त्यांच्या उजव्या हातात देतात. तांब्यामध्ये सत्त्व-रज प्रधान शक्ती कार्यरत असते. तांब्यामध्ये प्रजापति आणि ब्रह्मा या देवतांच्या तत्त्वलहरी धारण करण्याचीही क्षमता असते. विद्यार्थ्यांनी तांब्याचे कडे धारण केल्यामुळे त्यांच्या देहात तांब्यातील सत्त्व-रज प्रधान लहरी प्रवाहित होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सत्त्व-रज प्रधान शक्ती कार्यरत होऊन त्यांचे मन आणि बुद्धी यांमध्ये सूक्ष्म स्तरावर कार्यरत असणार्‍या रज-तमात्मक लहरींचे प्रमाण न्यून होऊ लागते. विद्यार्थ्यांचा सत्त्वगुण वाढल्यामुळे त्यांची ज्ञानग्रहण करण्याची सात्त्विक तळमळ जागृत होते आणि परिणामस्वरूप ते अल्पावधीत शीघ्रगतीने ज्ञानार्जन करू लागतात. विद्यार्थ्यांनी सलग काही मास तांब्याचे कडे धारण केल्यामुळे त्यांच्या सूक्ष्म देहांतील रज-तम गुणांचे प्रमाण न्यून होऊन सत्त्व गुण वाढू लागतो आणि त्यांची सुप्तावस्थेत असणारी प्रतिभा जागृत होते. त्यामुळे त्यांना शृंगेरी पिठात शिकवले जाणारे वेदमंत्र आणि वेदातील ज्ञान सहजतेने ग्रहण करता येते.

कु. मधुरा भोसले

२. शृंगेरी पिठातील विद्यार्थ्यांनी ‘घनपाठी’ ही पदवी प्राप्त केल्यावर त्यांना त्यांच्या उजव्या हातात सोन्याच्या धातूचे कडे धारण करण्यास दिल्यामुळे होणारी आध्यात्मिक स्तरावरील प्रक्रिया आणि लाभ

जेव्हा विद्यार्थी ‘घनपाठी’ ही पदवी प्राप्त करतात, तेव्हा त्यांची मेधावी बुद्धी कार्यरत होते. ‘घनपाठी’ ही पदवी प्राप्त करणे कठीण असल्यामुळे ही पदवी प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना त्यांच्या उजव्या हातामध्ये सोन्याच्या धातूचे कडे धारण करण्यासाठी दिले जाते. अशा प्रकारे सोन्याचे कडे देऊन घनपाठी विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. घनपाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या उजव्या हातामध्ये धारण केलेले सोन्याचे कडे हे गौरवाचे भूषण असण्यासह ते आध्यात्मिक दृष्ट्याही पुष्कळ प्रमाणात लाभदायी आहे.

२ अ. घनपाठी विद्यार्थ्यांची सूर्यनाडी सतत कार्यरत झाल्यामुळे त्यांच्याकडे असणारे वेदमंत्र आणि वैदिक शब्द रूपी वैदिक ज्ञानाचे रूपांतर
तेजतत्त्वामध्ये होऊन वातावरणात तेजोमय ज्ञानलहरींचे प्रक्षेपण होणे

‘सोने’ या धातूमध्ये अन्य धातूंच्या तुलनेत सात्त्विकता आणि चैतन्य ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वाधिक असते. त्यामुळे सोन्याचे कडे धारण केल्यावर घनपाठी विद्यार्थ्यांची सूर्यनाडी सतत चालू रहाते. ‘सूर्यनाडी’ ही तेजतत्त्वप्रधान असल्यामुळे तिच्याकडून प्रक्षेपित झालेले तेज सोन्याच्या कड्यामध्ये आकृष्ट होऊन ते वातावरणात प्रक्षेपित होते. त्याचप्रमाणे घनपाठी विद्यार्थ्यांची सूर्यनाडी सतत कार्यरत झाल्यामुळे त्यांच्याकडे असणारे वेदमंत्र आणि वैदिक शब्द रूपी वैदिक ज्ञानाचे रूपांतर तेजतत्त्वामध्ये होऊन वातावरणात तेजोमय ज्ञानलहरींचे प्रक्षेपण होते. त्यामुळे घनपाठी विद्यार्थ्यांच्या देहाभोवती सूक्ष्मातून सोनेरी रंगाची आभा असलेले सूर्याचे ज्ञानमय संरक्षककवच सतत कार्यरत रहाते. त्यामुळे घनपाठी विद्यार्थ्यांचे अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.

२ आ. विद्यार्थ्यांनी त्यांच्या उजव्या हातात सोन्याचे कडे धारण केल्यामुळे त्यांच्या मेधावी बुद्धीचे रूपांतर देवगुरु बृहस्पतींच्या ज्योत्स्नास्वरूप दैवी बुद्धीमध्ये होणे आणि त्यांच्यामध्ये ब्राह्मतेज सतत जागृत रहाणे

घनपाठी विद्यार्थ्यांनी सोन्याचे कडे सतत धारण केल्यामुळे त्यांच्या मेधावी बुद्धीचे रूपांतर देवगुरु बृहस्पतींच्या ज्योत्स्नास्वरूप दैवी बुद्धीमध्ये होऊ लागते. त्यामुळे घनपाठी विद्यार्थ्यांकडे ईश्वरी चैतन्याचा ओघ सतत येत रहातो आणि त्यांच्यामध्ये ब्राह्मतेज सतत जागृत रहाते. त्यामुळे त्यांच्याकडून तेजोमय ज्ञानलहरींचे सतत प्रक्षेपण चालू होते.

२ इ. घनपाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृत झालेल्या ब्राह्मतेजाच्या माध्यमातून सरस्वतीदेवीची ज्ञानशक्ती घनपाठी विद्यार्थ्याच्या वाणीवर ‘वाक्देवी’ आणि बुद्धीमध्ये ‘ज्योत्स्ना’ या रूपाने कायमस्वरूपी कार्यरत होणे

घनपाठी विद्यार्थ्यांमध्ये असणारी ज्ञानशक्ती ब्राह्मतेजाच्या बळावर कार्यरत झाल्यामुळे त्यांना वेदांच्या मंत्रांचा उच्चार स्पष्टपणे आणि सहजरित्या करता येतो अन् त्यांना वेदांतील ज्ञानाचे आकलनही व्यवस्थित होते. घनपाठी विद्यार्थ्यांवर सरस्वतीमातेची कृपा झाल्यामुळे ती वाणीवर ‘वाक्देवी’ आणि बुद्धीमध्ये ‘ज्योत्स्ना’ या रूपाने कायमस्वरूपी कार्यरत होते. तेजस्वी विचारांच्या स्वरूपातील ज्ञानशक्तीमुळे घनपाठी विद्यार्थ्यांचे देहमंडल शुद्ध होते आणि नादशक्तीच्या स्वरूपातील ज्ञानशक्तीमुळे वायुमंडलाची शुद्धी होते. अशा प्रकारे घनपाठी विद्यार्थ्यांतील वेदांतील ज्ञान आणि वेदांचे मंत्र यांच्यामुळे व्यष्टी अन् समष्टी अशा दोन्ही स्तरांवर लाभ होतो.

३. वेदांचे मंत्र आणि वेदांचे ज्ञान यांच्यातील भेद

टीप – ऋषिमुनींना वेदमंत्रांचे दर्शन झाले होते. अनेक ऋषिंना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांच्या मंत्रांचे दर्शन झाल्यावर त्यांनी वेदांतील विविध शाखांच्या ऋचा रचल्या. त्यामुळे त्यांना ‘मंत्रद्रष्टा ऋषि’ असे संबोधले जाते. ‘वेद’ हे ‘अपौरुषेय’ आहेत; म्हणजे त्यांची निर्मिती मनुष्याने केलेली नसून साक्षात् ईश्वराने केलेली आहे. त्यामुळे ते अनादि आणि अनंत आहेत. ‘वेद’ म्हणजे साक्षात् भगवंताची महापरावाणी आहे. वेदांचे ज्ञान स्थुलातून ऋचा किंवा मंत्र यांच्या रूपाने वाचता येत असले आणि त्यांचे मंत्राच्या रूपाने वैखरी वाणीतून उच्चारता येत असले, तरी वेदांचे मूळ ज्ञान परमेश्वराच्या परावाणीतील आहेत. त्यामुळे त्यांचे ज्ञान ब्रह्मांडात सूक्ष्मतम आणि निर्गुण स्तरावर ज्ञानलहरींच्या स्वरूपात कार्यरत असते.’

कृतज्ञता : ‘देवा तुझ्या कृपेमुळे देवभूमी असणार्‍या भारतदेशामध्ये मला हिंदु धर्मात जन्म मिळाल्याबद्दल तुझ्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे’, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०२१)