कालीचरण महाराज यांची २४ घंट्यांत सुटका केली नाही, तर हिंदु महासभा आंदोलन करणार ! 

हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी त्रिदंडी महाराज यांची घोषणा

कालीचरण महाराज

नवी देहली – म. गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या कालीचरण महाराज यांना पुढील २४ घंट्यांत सोडण्यात आले नाही, तर हिंदु महासभा रस्त्यावर उतरून आंदोेलन करील, अशी चेतावणी  हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी त्रिदंडी महाराज यांनी दिली आहे.

स्वामी त्रिदंडी महाराज

स्वामी त्रिदंडी महाराज म्हणाले की, भारताला ‘चेटकीण’ म्हणणारे मोकाट फिरत आहेत, माता सीता आणि भगवान श्रीराम यांना शिवीगाळ करणार्‍यांवर कायद्याद्वारे कोणतीही कारवाई होत नाही, राष्ट्रध्वज जाळणारेही वाचतात, सनातन संस्कृती खंडित करणारे शासनाच्या पाठिंब्याने मोकळे आहेत; मात्र जे शेकडो क्रांतीकारक आणि फाळणीच्या वेळी लाखो लोकांच्या मृत्यूला उत्तरदायी आहेत, त्या गांधींना कालीचरण महाराज यांनी महात्मा न मानल्याने त्यांना अटक केली जाणार आहे का ? असा प्रश्‍न त्यांनी विचारला.

कालीचरण महाराज यांची अटक अवैध ! – अधिवक्ता विष्णुशंकर जैन

अधिवक्ता विष्णु शंकर जैन

छत्तीसगड पोलिसांनी मध्यप्रदेशातील खजुराहो येथून कालीचरण महाराज यांना अटक करतांना मध्यप्रदेश पोलिसांना याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. छत्तीसगड पोलिसांचे हे वर्तन नियमबाह्य आहे. याविषयी अधिवक्ता विष्णुशंकर जैन यांनी ट्वीट करून ‘कालीचरण महाराज यांची अटक अवैध आहे’, असे म्हटले आहे.

हिंदूंच्या देवतांचा अवमान होतो, तेव्हा कारवाई का होत नाही ‘! – जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर यतीद्रानंद गिरि

जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर यतीद्रानंद गिरि

कालीचरण महाराज यांनी गांधी यांना अपशब्द म्हटले. त्याचे समर्थन करता येऊ शकत नाही; मात्र देशात भगवान श्रीराम यांना अनेकदा शिवीगाळ करण्यात आली, माता सीतेला व्यभिचारिणी म्हटले गेले, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका आणि चित्रपट यांमधून हिंदूंच्या देवतांची थट्टा उडवण्यात आली, त्यांची नग्न चित्रे रेखाटण्यात आली. त्या वेळी कोणतीही कारवाई का होत नाही ? त्या वेळी कुणीच का बोलत नाही ? कोणतीही वृत्तवाहिनी हे सूत्रे उपस्थित का करत नाही ? तेव्हा सर्व निधर्मीवादी कुठे लपतात ? अशी प्रतिक्रिया जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर यतीद्रानंद गिरि यांनी व्यक्त केली आहे.

महामंडलेश्‍वर यतीद्रानंद गिरि पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यासाठी कुणा एकाला श्रेय दिले जाऊ शकत नाही. या लढ्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळ गंगाधर टिळक, लाला लाजपत राय आदी लोकांचाही समावेश होता. गांधी आफ्रिकेतून भारतात येण्यापूर्वीपासून स्वातंत्र्यसैनिक अंदमानच्या कारागृहात यातना सोसत होते. त्यामुळे एका व्यक्तीमुळे स्वातंत्र्य मिळाले, असे आम्ही म्हणू शकत नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणारे मोकळे का ? – विहिंपचे प्रवक्ते विनोद बंसल

विहिंपचे प्रवक्ते विनोद बंसल

विश्‍व हिंदु परिषदेचे प्रवक्ते विनोद बंसल यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, छत्तीसगड सरकारने गांधी यांच्याविषयी बोलणार्‍याला मध्यप्रदेशात घुसून उचलून नेले; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदूंवर सातत्याने प्रहार करणारे अन् आतंकवाद्यांचे समर्थन करणारे मध्यप्रदेशात रहातात. त्यांच्यावर काही कारवाई होईल का ? असा प्रश्‍न विचारला आहे. बंसल यांचा रोख काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्यावर आहे.

तबलिगीचे मौलाना साद यांना अद्याप अटक का नाही ? – सामाजिक माध्यमांवर प्रश्‍न

सामाजिक माध्यमांतूनही कालीचरण महाराज यांच्या अटकेवरून टीका होत आहे. एका व्यक्तीने म्हटले की, कालीचरण महाराज हिंदु असल्याने त्यांना सहजपणे अटक करण्यात आली; मात्र तबलिगी जमातचे अध्यक्ष मौलाना (इस्लामी विद्वान) साद यांना अटक करण्यास काय अडथळा आहे ? वर्ष २०२० मध्ये देहलीतील तबलिगी जमातच्या मुख्यालयातून देशभरात परतलेल्या सदस्यांमुळे कोरोनाचा प्रसार झाला. या प्रकरणी तबलिगीचे प्रमुख मौलाना साद यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे; मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. (जवळपास दीड वर्षानंतरही जनताद्रोही कृत्य करणार्‍याला अटक न करणारे पोलीस कायद्याचे रक्षक कि भक्षक ? पोलिसांनी स्वतःहून कारवाई करण्याचे टाळले कि त्यांना ‘वरून’ आदेश असल्याने त्यांनी अद्याप कारवाई केलेली नाही, हे त्यांनी जनतेला सांगायला हवे ! हिंदूंना एक न्याय आणि धर्मांधांना वेगळा न्याय, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! – संपादक)