हिंदूंची सत्ता येणे, हेच काँग्रेसचे धोरण ! – खासदार असदुद्दीन ओवैसी  

राहुल गांधी यांच्या ‘हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ’ या विधानाचे प्रकरण  

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि एम्.आय.एम्.चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी

नवी देहली – ‘हिंदु’ म्हणून सत्ता मिळवणे, हेच काँग्रेसचे धोरण आहे का ?, असा प्रश्‍न एम्.आय.एम्.चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विधानावर उपस्थित केला आहे. ‘राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी हिंदुत्वासाठी पार्श्‍वभूमी सिद्ध केली आहे. भारत भारतियांचा आहे, केवळ एकट्या हिंदूंचा नाही’, असेही ओवैसी यांनी म्हटले आहे. (‘भारत भारतियांचा आहे’, असे केवळ म्हणण्यासाठीच आहे, प्रत्यक्षात ओवैसी यांचे धर्मबंधू देशाकडून सोयीसुविधा लाटण्याव्यतिरिक्त देशासाठी ठोस काय करत असतात, हे त्यांनी सांगायला हवे ! – संपादक)

काय म्हणाले होते राहुल गांधी ?

जयपूर (राजस्थान) येथे काँग्रेसच्या सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, भारत हा हिंदूंचा देश आहे, हिंदुत्वनिष्ठांचा नाही. (हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा अर्थच न कळलेले राहुल गांधी असेच बालीश आणि हास्यास्पद विधानच करणार ! अशामुळेच त्यांना आणि त्यांच्या विधानांकडे कुणीच गांभीर्याने पहात नाहीत, हे काँग्रेसवाल्यांनाही आता ठाऊक झाले आहे ! – संपादक) हिंदुत्वनिष्ठ नथुराम गोडसे यानेच म. गांधी यांना ठार मारले. (स्वतःला ‘हिंदु’ म्हणवणार्‍या काँग्रेसवाल्यांनीच गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात शेकडो ब्राह्मणांच्या हत्या केल्या, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिखांचे हत्याकांड केले, यांविषयी राहुल गांधी का बोलत नाहीत ? – संपादक) हिंदुत्वनिष्ठ सत्तेसाठी जन्म घालवतात. त्यांना सत्याशी काही देणेघेणे नसते. ‘सत्ताग्रह’ हा त्यांचा मार्ग असतो, ‘सत्याग्रह’ नव्हे. दुसरीकडे हिंदु मात्र निर्भीडपणे सामोरा जातो. तो एक इंचही मागे हटत नाही. मी हिंदु आहे, हिंदुत्वनिष्ठ नाही. (‘हिंदु’ राहुल गांधी किती प्रसंगांना निर्भीडपणे सामोरे गेले, हे त्यांनी भारतियांना सांगितले पाहिजे ! – संपादक)