कोरोना संसर्गाच्या काळानंतर संघकार्य गतीने वाढवावे ! – मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व. संघ

सिद्धगिरी मठात संघाच्या २ दिवसांच्या बैठकीचा समारोप

सरसंघचालक मोहन भागवत

कोल्हापूर, २ डिसेंबर – कोरोना संसर्गकाळात संघ स्वयंसेवकांनी अविरतपणे सेवा कार्य केले. यात काही स्वयंसेवकांना प्राणही गमवावा लागला. कोरोनानंतर संघ कार्याची गती अधिक वाढावी. संघ शताब्दी काळात संघ कार्याचा परिणाम समाजातील सर्व घटकांवरून दिसेल अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. येथील सिद्धगिरी मठात पार पडलेल्या २ दिवसांच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सिद्धगिरी मठावर झाली. या बैठकीत संघटनात्मक गोष्टींसमवेत सेवाकाम, ग्रामविकास, धर्मजागरण, गोसंवर्धन, पर्यावरण अशा उपक्रमांवरही चर्चा झाली. कोरोनामुळे संघाचे प्रशिक्षणवर्ग होऊ शकले नव्हते. आता ते कसे घेता येतील यावरही चर्चा झाली. बैठकीला सरकार्यवाह श्री. दत्तात्रय होसबाळे, माजी सरकार्यवाह श्री. भैय्याजी जोशी, सहसरकार्यवाह श्री. कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, श्री. अरुणकुमार, श्री. सुरेश सोनी, श्री. रामदत्त उपस्थित होते.