कंगना राणावत काहीच चुकीचे बोलली नाही, हे माझे मत मी पालटणार नाही ! – विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेत्री कंगना राणावत

मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत यांनी देशाच्या स्वातंत्र्याविषयी जे वक्तव्य केले आहे, त्याच्याशी मी सहमत आहे. कंगना काहीच चुकीचे बोलली नाही, हे माझे मत मी पालटणार नाही. तिला समर्थन देण्यामागे स्वतःची काही कारणे होती, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘भारताला वर्ष १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले’, असे कंगना म्हणाली होती. त्यावर गोखले यांनी तिला समर्थन दिले होते. त्यामुळे गोखले यांच्यावरही टीका होऊ लागली होती. यासंदर्भात भाष्य करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली.

विक्रम गोखले म्हणाले…

१. कंगनाने व्यक्त केलेली मते तिची वैयक्तिक आहेत, माझीही मते वैयक्तिक आहेत. तिने तसे वक्तव्य केले, याला तिची कारणे आहेत. मी त्याला दुजोरा दिला, याला माझी वेगळी कारणे आहेत. आमची ओळख किंवा संबंध नाही. तिच्याशी नसली, तरी माझी राजकीय अभ्यासाशी ओळख आहे.

२. १८ मे २०१४ या दिवशीचा गार्डियन पेपर वाचा. त्यात जे लिहिलेले आहे, तेच कंगना बोलली आहे. कंगना काहीच चुकीचे बोलली नाही, हे माझे मत मी पालटणार नाही.

३. माझे भाषण माध्यमांनी पूर्ण दाखवले नाही. माध्यमांनी माझ्या भाषणाचा विपर्यास केला; पण मी माझ्या मतांवर ठाम आहे. १८ मे २०१४ या दिवशी खर्‍या अर्थाने देशाने जागतिक पटलावर उभे रहायला प्रारंभ केला.