आमदार संतोष बांगर यांनी कृषीमंत्र्यांशी संपर्क साधून पंचनामे करण्याचे आदेश देण्याविषयी केली मागणी !

हिंगोली जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांची पुष्कळ हानी !

अतीवृष्टीमुळे पिकांची हानी झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रशासनाने याची नोंद घेऊन स्वतःहून पंचनामे करणे आवश्यक आहे. असे असतांना पिकांची हानी झाल्यावर आमदार बांगर यांना कृषीमंत्र्यांना सांगावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद आहे. पंचनाम्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या दोषी कृषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक 

प्रतिनिधिक छायाचित्र

हिंगोली – जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे सोयाबीन आणि इतर पिके यांची हानी झाली आहे. २७ सप्टेंबर या दिवशी पिकांची पहाणी करतांना परिस्थिती पाहून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शेतातून थेट राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी संपर्क साधून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. जिल्ह्यात सध्या सोयाबीन काढणीच्या अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी शेतकर्‍यांनी सोयाबीन काढून त्याचे ढिग करून ठेवले आहेत; मात्र गेल्या ३-४ दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे पिकांची पुष्कळ हानी झाली आहे. आमदार बांगर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एस्. कच्छवे यांच्याशी दूरभाषवरून संपर्क साधून ‘जिल्ह्यात पीकहानीच्या पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी’, अशी सूचना त्यांनी त्यांना केली.