भारतात जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत, तोपर्यंतच राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील ! – गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल

हे कायमचे टिकून रहाण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करून देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतरविरोधी कायदा आदी कायदे बनवण्याला पर्याय नाही ! – संपादक

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल

कर्णावती (गुजरात) – राज्यघटना, धर्मनिरपेक्षता आणि कायदा हे तोपर्यंत चालतील, जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत. माझे शब्द लिहून ठेवा, जर हिंदूंची संख्या अल्प झाली, तर त्या दिवशी ना कुठलेही न्यायालय असेल, ना कुठला कायदा असेल, ना कुठली लोकशाही असेल, ना कुठली राज्यघटना असेल, सर्व काही हवेत गाडले जाईल. हवे तर तुम्ही माझ्या वक्तव्याचे चित्रीकरण करून ठेवू शकता, असे विधान गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केले आहे. ते गांधीनगर येथील भारतमाता मंदिरात आयोजित एका कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते. भारतमातेचे हे मंदिर देशातील पहिलेच मंदिर समजले जाते. या वेळी राज्याचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा, तसेच विश्‍व हिंदु परिषद आणि रा.स्व. संघ यांचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.

नितीन पटेल पुढे म्हणाले की,

१. मी सगळ्यांविषयी ही गोष्ट करत नाही. मी हे स्पष्ट करतो की, देशातील लाखो मुसलमान लोक देशभक्त आहेत. लाखो ख्रिस्ती देशभक्त आहेत. गुजरात पोलिसांत सहस्रो मुसलमान आहेत. ते सर्व देशभक्त आहेत. (असे देशभक्त देशातील धर्मांधांच्या आणि जिहाद्यांच्या विरोधात का बोलत नाहीत ? ते उघडपणे विरोध का करत नाहीत ? – संपादक)

२. एका धर्माशी निगडित व्यक्ती दुसर्‍या धर्माच्या व्यक्तीसमवेत कोणत्याही बळाचा वापर न करता, प्रलोभनाविना किंवा कपटी मार्गांचा वापर न करता विवाह करत असेल, तर अशा विवाहांना धर्मांतराच्या उद्देशाने करण्यात आलेले विवाह ठरवता येणार नाही.

३. मी धर्मांतरविरोधी कायद्याला विरोध करणार्‍या संघटनांना विचारू इच्छितो की, जर हिंदु मुली हिंदु तरुणांंशी, मुसलमान मुली मुसलमान तरुणांंशी, ख्रिस्ती मुली ख्रिस्ती तरुणांशी आणि शीख मुली शीख तरुणांशी विवाह करत असतील, तर तुम्हाला काय अडचण आहे ?

४. जर एखाद्या हिंदु तरुणाने एखाद्या मुसलमान तरुणीशी फसवून विवाह केला, तर त्याच्यावरही हाच कायदा लागू होईल. हा कायदा एखाद्या विशिष्ट धर्मासाठी केलेला नाही.