सोलापूर जिल्ह्यातील सौ. नंदा माने, सौ. नीलिमा खजुर्गीकर आणि सौ. स्वाती महामुनी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सोलापूर जिल्ह्यातील सौ. नंदा माने (वय ६६ वर्षे), सौ. नीलिमा खजुर्गीकर (वय ५२ वर्षे) आणि सौ. स्वाती महामुनी (वय ४९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘ऑनलाईन’ सत्संगात घोषित करण्यात आली आनंदवार्ता !

सौ. नंदा माने (डावीकडे) यांचा सत्कार करतांना श्रीमती आशा गोडसे
सौ. नीलिमा खजुर्गीकर (डावीकडे) यांचा सत्कार करतांना सौ. मनीषा पत्की
सौ. स्वाती महामुनी (डावीकडे) यांचा सत्कार करतांना श्रीमती जयश्री जावळकोटी

सोलापूर – वय अधिक असूनही तळमळीने सेवा आणि प्रत्येक कृती भावपूर्ण करणार्‍या अन् प्रेमभाव असणार्‍या अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील सौ. नंदा माने (वय ६६ वर्षे), तसेच झोकून देऊन तळमळीने गुरुसेवा करणार्‍या अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील सौ. नीलिमा खजुर्गीकर (वय ५२ वर्षे), तसेच सोलापूर येथील उत्साही, आनंदी आणि तळमळीने सेवा करणार्‍या सौ. स्वाती महामुनी (वय ४९ वर्षे) या ३ साधिका ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत, अशी आनंददायी घोषणा सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी १४ ऑगस्ट या दिवशी एका ‘ऑनलाईन’ सत्संगात केली. ही आनंदवार्ता ऐकून पातळी गाठलेल्या साधिकांसह ‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेल्या सर्वांची भावजागृती झाली.

१. या सत्संगात सनातन संस्थेच्या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उल्का जठार यांच्यासह २५० हून अधिक साधक अन् आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांचे नातेवाईक ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि कु. दीपाली मतकर यांनी आध्यात्मिक पातळी गाठलेल्या ३ साधिकांची गुणवैशिष्ट्ये सांगून त्यांच्याप्रमाणे गुण आत्मसात् करण्यास सांगितले.

२. या वेळी सौ. स्वाती महामुनी यांचा सत्कार ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती जयश्री जावळकोटी यांनी, तसेच सौ. नंदा माने यांचा सत्कार ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती आशा गोडसे यांनी, तर सौ. नीलिमा खजुर्गीकर यांचा सत्कार ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पत्की यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला.

‘तळमळ’ हा ईश्वराकडे घेऊन जाणारा उत्तम गुण ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

अध्यात्मात तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे. तसेच तळमळ हा ईश्वराकडे घेऊन जाणारा उत्तम गुण आहे. त्यामुळे अधिकाधिक जणांपर्यंत साधनेचा विषय पोचवण्यासाठी उत्साहाने आणि तळमळीने प्रयत्न करूया. अध्यात्मात प्रगती केलेल्या ३ साधिकांचे गुण आत्मसात् करून साधना करण्याचा प्रयत्न करा.


६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधिकांच्या नातेवाइकांचे मनोगत

१. कु. सायली महामुनी (सौ. स्वाती महामुनी यांची मुलगी) – आईची प्रगती झाल्याचे ऐकून पुष्कळ आनंद झाला.

२. श्री. सुमित महामुनी (सौ. स्वाती महामुनी यांचा मुलगा) – सर्वांची साधना व्हावी, अशी आईची तळमळ असते. आज सकाळपासूनच घरामध्ये आनंद जाणवत होता. ही आनंददायी वार्ता दिल्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !

३. सौ. प्रणोती महामुनी (सौ. स्वाती महामुनी यांच्या जाऊ) – ताईंची प्रगती झाल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. त्यांची सेवेविषयी पुष्कळ तळमळ आहे. ताईंनी आमच्यात पुष्कळ पालट घडवून आणले आहेत.

४. सौ. विद्या रणसिंग (सौ. नंदा माने यांची मुलगी) – आईची प्रगती झाल्याची वार्ता ऐकून जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आई प्रत्येकाला प्रेम देऊन सामावून घेते. तसेच आई इतरांना त्यांच्या चुका सांगतांनाही प्रेमाने सांगते.

५. कु. श्रद्धा खजुर्गीकर (सौ. नीलिमा खजुर्गीकर यांची मुलगी) – आई इतरांना सतत साहाय्य करते. आमच्याकडून ती अपेक्षा न करता आम्हाला समजून घेते. आई इतकी प्रेमळ आहे की, माझ्या मैत्रिणीही तिला भेटण्यासाठी आवर्जून घरी येतात.


६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधिकांचे मनोगत

सौ. स्वाती महामुनी

परात्पर गुरुदेवांनी माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले ! – सौ. स्वाती महामुनी

परात्पर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले. त्यांच्या कृपेमुळेच मी प्रगती करू शकले, त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच मी प्रगती करू शकले ! – सौ. नंदा माने

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच मला येथपर्यंत आणले आहे. त्यांच्या कृपेनेच मी प्रगती करू शकले. पूर्वीपासून सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक पू. (सौ.) संगीता जाधव यांनी मला वेळोवेळी साधनेविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा मला पुष्कळ लाभ झाला आहे.

देवानेच माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करवून घेतले ! – सौ. नीलिमा खजुर्गीकर

देवानेच माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करवून घेतले आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मी प्रगती करू शकले. गुरुदेव सर्व साधकांची प्रगती करवून घेणारच आहेत, यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे.