मैसुरू (कर्नाटक) : हावडा एक्सप्रेसमधून उतरले ४० बांगलादेशी घुसखोर !

हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी केली अटक

हावडा एक्सप्रेसमधून उतरलेले बांगलादेशी घुसखोर

मैसुरू (कर्नाटक) – येथील रेल्वे स्थानकावर हावडा एक्सप्रेसने आलेल्या ४० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना रेल्वे आणि स्थानिक पोलीस यांनी कह्यात घेतले. स्थानकावरील त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहून ‘हिंदु जागरण वेदिके’च्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. कोलकात्यातून प्रत्येक आठवड्याला येथे येणार्‍या हावडा एक्सप्रेसमधून हे सर्वजण एकत्रितपणे मैसुरूत उतरले होते. बहुतेकांकडे बंगालचा पत्ता असलेले आधारकार्ड आणि इतर कागदपत्रे असली, तरी त्यांपैकी बहुतेक कागदपत्रे बनावट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता प्रत्येकाने वेगवेगळी आणि गोंधळलेली विधाने केली. काहींनी मैसुरूच्या जवळच्या भागात मजुरीच्या कामासाठी आल्याचे सांगितले, तर काहींनी स्वतःला पर्यटक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासानुसार हे सर्वजण मैसुरूहून कोडगू जिल्हा आणि शेजारील केरळ राज्याच्या विविध भागांत जाऊन कॉफीच्या बागा अन् इतर कारखाने येथे बेकायदेशीरपणे काम मिळवण्याच्या मोठ्या योजनेने आले होते.

बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून घुसखोर इतर राज्यांत स्थलांतरित होत आहेत ! – एल्. नागेंद्र, माजी आमदार, भाजप

या संदर्भात माजी आमदार एल्. नागेंद्र म्हणाले की, प्रत्येक रविवारी बंगालमधून बांगलादेशी घुसखोर मैसुरूला येत आहेत. बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर घुसखोर इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत. सरकारने यांच्यावर करडी दृष्टी ठेवली पाहिजे. गृहमंत्री प्रियांक खर्गे संघाच्या सूत्राखेरीज दुसरे काहीच करत नाहीत. उद्या राज्यात दंगल झाली, तर त्यास राज्य सरकार थेट उत्तरदायी असेल. ताबडतोब घुसखोरांना रोखण्यासाठी कारवाई करा.

संपादकीय भूमिका

बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून तेथील बांगलादेशी घुसखोर अन्य राज्यांमध्ये जात आहेत का, याचे आता अन्वेषण झाले पाहिजे. या घुसखोरांना बंगालमधूनच बांगलादेशात पाठवण्याची व्यवस्था झाली पाहिजे !