घरावर आलेल्या फांद्या पालिकेने सांगूनही न हटवल्याने त्या काढण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू

बेंगळुरू महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे वृद्ध महिलेचा मृत्यू

बेंगळुरू (कर्नाटक) – घराच्या शेजारील झाडाच्या फांद्या घरावर येत असल्यामुळे त्या हटवण्यासाठी महापालिका प्रशासनानाला सातत्याने सांगूनही त्या हटवण्यात आल्या नाहीत. यामुळे ५८ वर्षीय प्रमिलाबाई यांनी स्वतः गच्चीवर जाऊन त्या हटवू लागल्या असतांना त्यांचा पाय घसरला आणि त्या भूमीवर पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात ३ दिवस उपचार चालू होते. अंततः त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील वाढलेल्या झाडांच्या तक्रारींवर महापालिका प्रशासन कोणतेच पाऊल उचलत नसल्याची टीका होत आहे.

प्रमिलाबाईंचे पती सिद्धराव यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाला बर्‍याच दिवसांपासून घराच्या आवारात वाढत असलेल्या झाडांचा त्रास होत होता. माझ्या पत्नीने झाडाची फांदी काढण्याचा प्रयत्न केला, केवळ या प्रयत्नात आज तिने तिचा जीव गमावला आहे. माझ्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती आणि ती माझी काळजी घेत होती, आता माझी काळजी कोण घेणार?, असा भावनिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पश्चिम विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी बी. सुदर्शन यांनी सांगितले की, आम्हाला त्या महिलेकडून झाडाविषयी कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर मी घटनास्थळी भेट दिली, तेव्हा ती महिला तिसर्‍या मजल्यावरील सज्जामध्ये घसरून पडल्याचे आढळले. ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे सुरक्षेसाठी कोणतेही रेलिंग्ज किंवा कोणतीही संरक्षक भिंत नव्हती.

संपादकीय भूमिका

याला उत्तरदायी असणार्‍यांवर हत्येचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली पाहिजे !