निवृत्तीच्या ४ वर्षांनंतर दोघा ब्रिगेडिअर्सना सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर बढती !

अशी घटना सैन्याला लज्जास्पद आहे ! याला उत्तरदायी असणार्‍या सर्व अधिकार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर सैन्यातील २ ब्रिगेडिअर्स निवृत्त झाल्यानंतरच्या ४ वर्षांनी त्यांना बढती देऊन मेजर जनरल करण्यात आले आहे. सैन्यात असतांना त्यांची बढती २ वर्षे प्रलंबित होती. नलिन भाटिया आणि व्ही.एन्. चतुर्वेदी अशी त्यांची नावे आहेत.

या दोघांनी सशस्त्र बल न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती; मात्र तेथे त्यांची मागणी फेटाळण्यात आल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यांना बढती का देण्यात आली नाही ? याची ‘माहिती अधिकारा’तून माहिती मागवण्यात आल्यावरही उत्तर देण्यात आले नव्हते. (जर असे होणार असेल, तर त्याला माहितीचा अधिकार कसे म्हणायचे ? ही मोगलाईच म्हणावी लागेल ! – संपादक) या सैन्याधिकार्‍यांच्या अधिवक्त्यांनी आरोप केला की, तत्कालीन सैन्यदलप्रमुख या दोघांना पूर्वीच्या सैन्यदलप्रमुखांच्या जवळच्या व्यक्ती समजत होते. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित करण्यात आले.