तमिळनाडूमध्ये गाय आणि वासरू यांच्या हत्येवर उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थगिती

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूमध्ये बकरी ईदसह कोणत्याही दिवशी राज्यभरात गाय आणि वासरे यांची हत्या करण्यावर पूर्ण बंदी घालण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की, उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंतिम भागात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. न्यायालयाने तमिळनाडू सरकारच्या विशेष अनुमती याचिकेवर नोटीस जारी केली. सरकारने युक्तीवाद केला की, उच्च न्यायालयाचा आदेश राज्यात लागू असलेल्या ‘तमिळनाडू ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट, १९५८’च्या तरतुदींच्या विरोधात आहे. या कायद्यानुसार १० वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि कामासाठी किंवा प्रजननासाठी उपयुक्त न राहिलेल्या गायींच्या हत्येला अनुमती देण्यात आली आहे; मात्र यासाठी सक्षम अधिकार्‍याची अनुमती घेणे आवश्यक आहे.