राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : ११.४.२०२१

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

अकोला येथे धर्मांधांकडून होळीची विटंबना आणि हिंदूंना मारहाण !

हिंदूंनी पेटवलेली होळी धर्मांधांच्या जमावाने पाणी टाकून आणि लाथा मारून विझवली !

‘अकोला येथील पोला चौकातील हनुमान मंदिराच्या परिसरात होळीच्या दिवशी म्हणजे २८.३.२०२१ च्या रात्री २०० ते ३०० जणांच्या धर्मांधांच्या जमावाने होळीदहनाच्या वेळी पुष्कळ अडथळे आणले. हिंदूंनी होळी पेटवल्यावर धर्मांधांनी त्यावर पाणी ओतले आणि लाथा मारून आग विझवली, तसेच हिंदूंना मारहाण केली. यासंदर्भातील चित्रफीत सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. याविषयीचे वृत्त ‘ऑप इंडिया’ने प्रसिद्ध केले आहे.’


संततीच्या संदर्भात कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्याविरुद्धचा खटला रहित !

कीर्तनात आयुर्वेद शास्त्राच्या ग्रंथातील संदर्भ देणे, हा गुन्हा ठरत नसल्याचा निर्वाळा !

‘कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर यांनी केलेले वक्तव्य हे आयुर्वेद शास्त्राच्या ग्रंथातील आहे. कीर्तनात अशा ग्रंथातील संदर्भ देणे, हा गुन्हा ठरत नसल्याचे निरीक्षण नोंदवत संगमनेरच्या सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांच्याविरुद्ध खटला चालवण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रहित केला. इंदुरीकर महाराज यांनी ‘स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग अशीव वेळी झाला, तर होणारी संतती रांगडी, बेवडी अन् खानदान मातीत घालणारी होते’, असे वक्तव्य केले होते.’


बांगलादेशमध्ये राधा गोबिंद आश्रम धर्मांधांनी जाळला !

‘बांगलादेशमध्ये आमचे राज्य आहे’, असेच बांगलादेशातील धर्मांध हे भारताला आणि हिंदूंना दाखवून देत आहेत. हे लक्षात घेऊन पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर दबाव आणून तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

‘बांगलादेशातील महंमदपूर उपजिल्ह्यात असणार्‍या ४०० वर्षे प्राचीन परुर्कुल अष्टग्राम महास्मशान आणि राधा गोबिंद आश्रम अज्ञातांनी जाळला. यामुळे येथील रथ आणि देवतांच्या मूर्ती भस्मसात झाल्या.’


बांगलादेशातील हिंसाचारामागे बंदी घातलेली जिहादी संघटना जमात-ए-इस्लामीचा हात !

एखाद्या संघटनेवर बंदी घातली म्हणजे तिचे कार्य संपत नाही, हे लक्षात घेऊन अशा बंदी घातलेल्या संघटनांचा पूर्णपणे निःपात करणे आवश्यक ठरते !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौर्‍याच्या आधी आणि नंतर झालेल्या हिंसाचारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या दौर्‍याला बांगलादेशातील धर्मांधांनी विरोध केला होता. या हिंसाचारामागे बंदी घातलेली संघटना जमात-ए-इस्लामी हिचा हात असल्याचे समोर आले आहे.’


नांदेड येथे शीख समाजाच्या धार्मिक मिरवणुकीत पोलिसांवर तलवारीने आक्रमण !

 १४ पोलीस घायाळ  पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड

‘नांदेड येथे शीख समाजाच्या वतीने २९.३.२०२१ या दिवशी काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ या धार्मिक मिरवणुकीला आडकाठी करणार्‍या पोलिसांवर जमावाने तलवारीने आक्रमण केले. या आक्रमणात १४ पोलीस घायाळ झाले. यांमधील ४ पोलिसांची स्थिती गंभीर आहे. आक्रमणात पोलीस अधीक्षकांच्या वाहनासह ७ गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली.’


वाराणसी येथील भरत मिलाप मैदानाच्या कडेला शीलालेखावर लावण्यात आलेल्या रामचरितमानसमधील चौपाईवर घाणीचे साम्राज्य

‘वाराणसी येथील नाटीईमली भागातील भरत मिलाप मैदानाच्या कडेला शीलालेखावर पवित्र रामचरित्रमानसची चौपाई लावण्यात आली आहे. हा शीलालेख रस्त्याच्या बाजूने असल्यामुळे त्यावर प्राण्यांचे मलमूत्र, रस्त्यावरील धूळ आणि घाण सतत उडत असते. त्यामुळे हा शीलालेख तेथून हटवून दुसर्‍या पवित्र ठिकाणी लावण्यात यावा’, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रीय मानवाधिकार आणि न्याय परिषदेचे महासचिव अधिवक्ता अरुण कुमार मौर्य, अधिवक्ता विकास सेठ, राहुल सिंह, शशिकांत मालवीय, हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी अन् श्री. राजन केसरी उपस्थित होते.’


जयपूर येथे पोलीस अधिकार्‍याकडून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न होळीसाठी रोवण्यात आलेला ‘प्रल्हाद’ (खांब) पोलिसांनी उखडून फेकला !

‘हिंदु धर्मातील मुख्य सणांपैकी एक असलेल्या होळीच्या निमित्ताने सर्व हिंदूंच्या वतीने जयपूर येथील बदनपुरा पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या एका चौकात होळी पेटवण्यासाठी ‘प्रल्हाद’ (होलिका आणि तिच्या मांडीवर भक्त प्रल्हाद बसलेला, हे दाखवणारा प्रतिकात्मक खांब) रोवण्यात आला होता. ही परंपरा मागील १०० वर्षांहून अधिक काळापासून चालू आहे. हा ‘प्रल्हाद’ गलतागेट पोलीस ठाण्याचे अधिकारी सतीश यांनी उखडून फेकून दिला. तसेच त्यांनी उपस्थित हिंदूंना चेतावणी दिली, ‘येथे होळी पेटणार नाही आणि जे येथे होळी पेटवण्याचा प्रयत्न करतील त्यांना कारागृहात बंद डांबण्यात येईल.’