त्रावणकोर देवस्वम् समितीकडून मंदिरांच्या भूमीत रा.स्व. संघाकडून घेण्यात येणार्‍या प्रशिक्षणावर बंदी !

हिंदूंच्या मंदिरांमध्ये हिंदूंच्या संघटनेला हिंदूंना प्रशिक्षण देण्यापासून रोखणारी त्रावणकोर देवस्वम् समिती हिंदूंची कि अन्य पंथियांची ? मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या कह्यात देणे किती आवश्यक आहे, हे समितीच्या अशा निर्णयांवरून दिसून येते ! केरळमधील अशा हिंदुविरोधी कारवाया रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन अपरिहार्य !  

प्रातिनिधिक छायाचित्र

कोची (केरळ) – त्रावणकोर देवस्वम् समितीच्या प्रशासनातील १ सहस्र २४२ हिंदु मंदिरांच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांना काम करण्यास अनुमती देणारे, तसेच शारीरिक प्रशिक्षण किंवा सामूहिक कवायत करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारची अनुमती देणार्‍या देवस्वम् समितीच्या अधिकार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची चेतावणीही समितीकडून देण्यात आली आहे.

१. ३० मार्च या दिवशी देवस्वम् आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, काही अधिकारी मंदिराच्या आवारात अशा प्रकारची अवैध कामे करण्यास अनुमती देत आहेत, ही गंभीर गोष्ट आहे. (केरळमध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. असे असतांना हिंदूंना शारीरिक प्रशिक्षण देणे, हे अवैध काम कसे ? यातून समितीचा हिंदुद्वेष दिसून येतो ! – संपादक)

२. देवस्वम् समितीचे अध्यक्ष एन्. वासू म्हणाले की, मंदिराची भूमी राजकीय हेतूने वापरू नये, यासाठी मंडळाने काही वर्षांपूर्वी हा निर्णय घेतला होता. केवळ रा.स्व. संघालाच नाही, तर कोणत्याही संघटनेला किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला मंदिर परिसर वापरायला अनुमती दिली जाणार नाही. संघाच्या विरोधात केलेल्या तक्रारीच्या आधारे हा आदेश देण्यात आला आहे. (संघाच्या विरोधात हिंदुद्वेष्ट्यांनी तक्रारी केल्या, तरी सारासार विचार करण्याचे दायित्व देवस्वम् समितीचे आहे; मात्र केरळमध्ये सर्वत्रच साम्यवाद्यांचा प्रभाव असल्यामुळे अशा हिंदुविरोधी कृती होत आहेत ! – संपादक)

३. सर्व अधिकार्‍यांना अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पावले उचलण्याचे आणि मुख्य कार्यालयाला त्याचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन करण्यात अपयशी ठरलेल्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आदेशात म्हटले आहे. (असले आदेश काढण्यापेक्षा राज्यातील मंदिरांमध्ये धार्मिक परंपरांचे पालन कसे होईल, यासाठी समितीने शक्ती पणाला लावली असती, तर हिंदूंचे आणि मंडळाचेही भले झाले असते ! – संपादक)