तमिळनाडूतील सहस्रावधी मंदिरांची स्थिती दयनीय ! – सद्गुरु जग्गी वासुदेव

  • कुठे मंदिरांना दान देऊन त्यांची देखभाल करणारे पूर्वीचे राजे, तर कुठे सरकारीकरणाद्वारे हिंदूंची मंदिरे लुटणारे, तसेच त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करणारे आतापर्यंतचे शासनकर्ते !
  • मंदिरांविषयी राजकारण्यांची उदासीनता पहाता देशातील श्रीमंत मंदिरांनी देशातील ज्या मंदिरांची स्थिती दयनीय आहे, त्यांचे दायित्व घ्यायला हवे ! तसेच संपूर्ण देशातील मंदिरांचे व्यवस्थापन सुलभ व्हावे यासाठी एका समिती किंवा महासंघ यांचीही स्थापन केली पाहिजे !
  • शंकराचार्यांना खोट्या आरोपाखाली अटक करणारे अण्णाद्रमुक सरकार तमिळनाडूमध्ये सत्तेत आहे. असे हिंदुद्वेषी सरकार मंदिरे सुस्थितीत काय ठेवणार ?
अर्धनारिश्‍वर मंदिर

नवी देहली – युनेस्कोने तमिळनाडूतील मंदिरांच्या दयनीय स्थितीविषयी यापूर्वीच चिंता व्यक्त केली आहे. जुलै २०२० मध्ये तमिळनाडू सरकारने स्वतः मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले की, राज्यातील ११ सहस्र ९९९ मंदिरे अशी आहेत जेथे आर्थिक संकटामुळे एकदाही पूजा करण्यात येत नाही. ३४ सहस्र मंदिरे अशी आहेत की, तेथील वार्षिक उत्पन्न १० सहस्र रुपयांपेक्षाही अल्प आहे. याव्यतिरिक्त ३७ सहस्र मंदिरांमध्ये पूजा, देखभाल, सुरक्षा, स्वच्छता यांचे दायित्व एकाच व्यक्तीवर आहे, अशी माहिती देत सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी तमिळनाडूतील मंदिरांच्या दुःस्थितीविषयीची ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव साऊथ २०२१’मध्ये जनतेला अवगत केले.

(सौजन्य :  इंडिया टुडे)

१. सद्गुरु वासुदेव म्हणाले की, राज्यातील ५ लाख एकर भूमी मंदिरांच्या नावावर आहे. २ कोटी ३३ लाख चौरस फूट जागेवर बांधकाम आहे; मात्र यांतून केवळ १२८ कोटी रुपयेच वार्षिक उत्पन्न येत आहे. यांतील १४ टक्के रक्कम लेखापरीक्षण आणि व्यवस्थापन यांवर खर्च होते, तर १-२ टक्के पूजा, सण, उत्सव यांवर खर्च होते.

२. सद्गुरु वासुदेव यांनी म्हटले की, गुरुद्वारा प्रबंधक कमिटीकडे ८५ गुरुद्वारांचे दायित्व आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न १ सहस्र कोटी रुपयांचे आहे. त्यांच्या धर्मबांधवांची ते सेवाही चांगली करतात. तमिळनाडूमध्ये हिंदूंची लोकसंख्या ८५ टक्के आहे. येथे ४४ सहस्र मंदिरे आहेत; मात्र त्यांचे वार्षिक उत्पन्न केवळ १२८ कोटी रुपये आहे.