विवाहितेचा सासरी झालेल्या छळाला पतीच उत्तरदायी ! – सर्वोच्च न्यायालय

पत्नीचे सर्व प्रकारचे दायित्व हे तिच्या पतीचेच असते. त्याने तिचे सर्व गोष्टींपासून रक्षण करणे, हे त्याचे कर्तव्यच आहे. हेही आता न्यायालयाला सांगावे लागत असेल, तर भारतातील कुटुंबव्यवस्थेमध्ये किती अनाचार चालू आहे, हे लक्षात येते !

नवी देहली – भारतात विवाहानंतर प्रचलित प्रथेनुसार, पत्नी पतीच्या घरी रहायला जाते; परंतु सासरी एखाद्या महिलेला कुटुंबियांकडून मारहाण झाली, तर तिच्या दुखापतींसाठी मुख्यत: तिचा पतीच उत्तरदायी असेल, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी केली आहे. या वेळी न्यायालयाने पत्नीला मारहाणीचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. त्या व्यक्तीचा हा तिसरा विवाह होता, तर संबंधित महिलेचा हा दुसरा विवाह होता. पतीच्या अधिवक्त्यांनी पतीकडून नाही, तर सासर्‍यांकडून मारहाण करण्यात आली होती, असे सूत्र मांडले होते. त्यावर न्यायालयाने वरील टिप्पणी केली.