गडचिरोली येथे गोवंशियांची वाहतूक करणार्‍या टोळीकडून १ कोटी १५ लाख ६८ सहस्र रुपयांचा ऐवज जप्त

१४१ गायी, म्हशी आणि रेडे यांची केली वाहतूक

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशियांना उघडपणे हत्येसाठी नेले जाते, याचा अर्थ कायदा-सुव्यवस्था हा प्रकार राज्यात अस्तित्वात आहे का ? असाच प्रश्‍न पडतो ! केवळ कायदा असून उपयोग काय ? त्याची प्रभावी कार्यवाही कधी होणार ? या सर्वच प्रश्‍नांची उत्तरे शासनाने द्यायला हवीत !

गडचिरोली – येथे अल्प मूल्यामध्ये शेतकर्‍यांकडून गायी, म्हशी यांसह जनावरे खरेदी करून ती तेलंगाणाच्या पशूवधगृहात नेणार्‍या एका टोळीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून १ कोटी १५ लाख ६८ सहस्र रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. गडचिरोलीच्या सीमेवरील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई समजली जाते.

आरमोरी तालुक्यात ठाणेगाव मार्गावर वाहनांची पडताळणी केल्यावर त्यातील ५ ट्रकमध्ये १४१ गायी, म्हशी आणि रेडे सापडले. या जनावरांचे मूल्य १७ लाख ५५ सहस्र रुपये आहे. आरोपींकडून १ लाख १३ सहस्र रुपयांचे १० भ्रमणभाष जप्त केले आहेत. जप्त केलेल्या वाहनांचे मूल्य ९७ लाख रुपये आहे. अटक केलेले बहुतांश आरोपी तेलंगाणातील, तर अन्य आरोपी नागपूर आणि मध्यप्रदेश येथील आहेत.