पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार बहुमताअभावी कोसळले

नारायणसामी

पुदुच्चेरी – येथील काँग्रेसचे सरकार बहुमताच्या अभावी कोसळले. काँग्रेसप्रणीत आघाडीतील आणखी २ आमदारांनी त्यागपत्र दिल्याने मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे सरकार अल्पमतात आले होते. २२ फेब्रुवारीला सरकारला विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने ते कोसळले. काँग्रेस आणि द्रमुक यांच्या प्रत्येकी एक आमदाराच्या त्यागपत्रामुळे ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरले होते. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर ७ जागा रिक्त आहेत. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते.

हा तर राजकीय वेश्याव्यवसाय ! – मुख्यमंत्री नारायणसामी

काँग्रेसने अनेकदा आमदार, खासदार यांची फोडाफोडी केली आहे, त्याविषयी नारायणसामी कधी का बोलले नाहीत ?

आमदारांनी पक्षासमवेत निष्ठा राखली पाहिजे. त्यागपत्र देणारे आमदार आता लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत; कारण त्यांना ‘संधीसाधू’ अशी हाक मारली जाईल.
पुदुच्चेरीत जे काही चालू आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय आहे; पण सत्याचाच विजय होईल, असा विश्‍वास नारायणसामी यांनी बहुमत सिद्ध करण्याच्या आधी व्यक्त केला होता.