ममता बॅनर्जी भ्रष्ट आणि सैतान व्यक्ती असल्याने त्यांचा रामावर राग असणे स्वाभाविक ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह

आमदार सुरेंद्र सिंह व ममता बॅनर्जी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ममता बॅनर्जी यांच्या डीएन्एमध्ये दोष आहे. त्या राक्षसी संस्कृतीमधून आल्या आहेत. कोणताही राक्षस रामावर प्रेम करू शकत नाही. बॅनर्जी या भ्रष्ट आणि सैतान व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांचा रामावर राग असणे स्वाभाविक आहे, असे विधान उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे. ‘बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी घडवलेल्या हिंसाचारातून त्यांच्या राक्षसी वागण्याचे आणखी पुरावे मिळतात’, असा आरोपही सिंह यांनी केला. कोलकाता येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ममता बॅनर्जी भाषण करण्यास उभ्या राहिल्याने ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त करत भाषण करण्यास नकार दिला होता. त्यावर सिंह यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मध्यप्रदेश विधानसभेचे हंगामी अध्यक्ष आणि आमदार रामेश्‍वर शर्मा यांनी ममता बॅनर्जी यांना रामायणाची एक प्रत पाठवली आहे. ‘दीदी (ममता बॅनर्जी) रामायणाचे वाचन करतील आणि प्रभु श्रीरामाचे चरित्र समजतील, अशी अपेक्षा आहे. तसेच येथून पुढे ‘जय श्रीराम’च्या घोषणांना विरोध करणार नाहीत’, असे रामेश्‍वर शर्मा यांनी ट्वीट करत म्हटले आहे.