काही स्तरांवर सुधारणांचे प्रयत्न !
मार्च-एप्रिल २०२३ मध्ये ‘सनातन प्रभात’ सलग १८ दिवस राज्यातील बसस्थानकांच्या दुरावस्थेची वृत्तमाला प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर १ मे २०२३ या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियान चालू केले. सध्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक या अभियानाला समर्थपणे पुढे नेत आहेत. बसस्थानके स्वच्छ रहावीत, यासाठी ते स्वत: जातीने बसस्थानकांना भेटी देत आहेत; परंतु अद्यापही काही बसस्थानकांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. ही स्थिती प्रशासनाच्या लक्षात यावी, यासाठी ‘सनातन प्रभात’ने बसस्थानकांच्या दु:स्थितीविषयीची वृत्तमाला पुन्हा चालू केली आहे.

पिंपरी-चिंचवड – येथील वल्लभनगर बसस्थानक हे औद्योगिक आणि रहिवासी क्षेत्रातील प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे; मात्र सध्या या स्थानकावर काही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
१. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपेक्षित अशी नाही. तेथील पाणी ‘हे हात धुण्याचे आहे कि पिण्यासाठीचे ?’, हे कळत नाही. याविषयी विचारणा केली असता तेथील कर्मचार्याने सांगितले, ‘‘लवकरच ३ जलशीतक (पाण्याचे कुलर) बसवण्यात येणार आहेत.’’ स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात तिथे पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना विकतचे पाणी विकत घेण्यावाचून पर्याय उरलेला नाही.
२. काही ठिकाणी प्लास्टिक पडलेले असते. काही ठिकाणी कचरा, घाण आणि धुळीचे साम्राज्य आहे. त्याविषयी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने तेथील कर्मचार्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत; पण यामध्ये प्रवाशांचे सहकार्यही आम्हाला अपेक्षित आहे. काहींना आम्हाला सांगावे लागते की, येथे उघड्यावर शौच करू नका. सुलभ शौचालय तिकडे आहे. थुंकू नका, प्लास्टिक टाकू नका त्यासाठी कचरा पेटी ठेवली आहे.’’ (असे करणार्या प्रवाशांना कडक दंड करणे, हाच त्यावरील उपाय आहे ! – संपादक) काही दिवसांपूर्वी अन्य वृत्तपत्रामध्ये स्थानकाच्या अस्वच्छतेविषयी बातमी आली होती. त्यामध्ये आगार प्रमुख वैशाली कांबळे म्हणाल्या होत्या की, प्रवाशांकडून घेण्यात येणारा स्वच्छता अधिभार हा एस्.टी.च्या स्थानक स्वच्छेतेसाठी नसून बसच्या स्वछतेसाठी आहे. आम्ही उपलब्ध असणार्या मनुष्यबळावर स्थानक स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. या बातमीमध्ये प्रवाशांनीही स्वच्छतेविषयी असंतोष व्यक्त केला होता.
३. लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या प्रवाशांना बसची वाट पहात असतांना थांबण्यासाठी हक्काचे विश्रामगृह उपलब्ध नाही.
४. बसस्थानकावरील महिलांसाठीचा ‘हिरकणी कक्ष’ (लहान बाळांना दूध पाजण्यासाठी महिलांसाठी असलेली खोली) एरवी बंद असतो; परंतु एखाद्या महिलेला त्याचा उपयोग करायचा असेल, तर तिला तो बंद असल्याने त्याविषयी कळू शकत नाही. तरी त्यावर कुणाला आवश्यकता असल्यास त्याची चावी कुठे उपलब्ध होईल, याची माहिती देणारा फलक लावणे आवश्यक आहे.
प्रशासनाकडून होत असलेले सकारात्मक पालट !एकीकडे काही गंभीर त्रुटी असल्या, तरी दुसरीकडे काही गोष्टींत प्रशासकीय तत्परताही दिसून येत आहे. १. दुरुस्ती आणि स्वच्छता : बसस्थानकावरील खड्डे बुजवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे. तसेच, पूर्वीच्या तुलनेत शौचालयांची स्वच्छता अधिक चांगल्या प्रकारे राखली जात आहे. २. संवाद यंत्रणा कार्यान्वित : स्थानकावर आगार व्यवस्थापक आणि अधिकारी यांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावलेले आहेत. विशेष म्हणज या क्रमांकांवर संपर्क साधला असता अधिकार्यांनी तत्काळ प्रतिसाद देऊन शंकांचे निरसन केले. ३. नियोजित वाहनतळ व्यवस्था : खासगी कंत्राटदाराद्वारे वाहनतळाची योग्य व्यवस्था राखली जात असून, दुचाकीसाठी १० रुपये आणि चारचाकीसाठी २० रुपये असे नाममात्र दर आकारले जात आहेत. ४. इतर सुविधा : स्थानकावर वेळापत्रक ठळकपणे लावलेले आहे. उपाहारगृहाच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याने सध्या ती व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात मागच्या बाजूला करण्यात आली आहे. चालक-वाहकांच्या विश्रांतीसाठीही नवीन सोय करण्याचे काम चालू आहे. |
बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह पाठवा !आपल्या भागातील बसस्थानकेही अस्वच्छ असल्यास, पिण्याचे पाणी, बसण्यासाठीची बाकडी, कचराकुंड्या अशा किमान सुविधाही नसल्यास, बसस्थानकांच्या अशा दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह ‘सनातन प्रभात’साठी ‘९२२५६३९१७०’ या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य करा ! नागरिकांना आवाहन !‘बसस्थानकांची स्वच्छता’ हे जसे एस्.टी. महामंडळाचे दायित्व आहे, तसेच ‘सुजाण नागरिक’ म्हणून आपलेही दायित्व आहे. ‘एस्.टी. ही सर्वसामान्यांचा आधार आहे’, याची जाणीव ठेवून बसस्थानके स्वच्छ-सुंदर राखण्यासाठी प्रत्येक नागरिकानेही या अभियानामध्ये योगद्यान द्यावे. सूचना नोंदवा !वल्लभनगर येथील बसस्थानकाच्या दु:स्थितीविषयी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Suggestions.aspx’ या लिंकवर ‘सनातन प्रभात’ने नोंदवली आहे. आपणही आपली सूचना त्वरित नोंदवा ! |
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे भूमींच्या दरात वाढ !
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ७३५.२५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण !
अनिरुद्ध कुंभार यांची ‘हिंदु एकता आंदोलन’च्या सांगली शहराध्यक्षपदी नियुक्ती !
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा ! – मुख्यमंत्री