नाशिकच्या ओझर येथील पशूवधगृहातून १ सहस्र ९०० किलो गोवंशियांचे मांस जप्त

गोवंशहत्या बंदी कायद्याविषयी कुचकामी कारवाई होत असल्याचेच हे भयावह परिणाम आहेत ! कायद्याचा धाक कुणाला राहिलेलाच नाही, याचे कारण निष्क्रीय आणि भ्रष्ट पोलीस प्रशासन हेच आहे. पोलिसांवर राज्यकर्त्यांचा असलेला दबावही याला कारणीभूत आहे ! आपल्या राज्यात कायद्याची काटेकोर कारवाई होत नाही, याविषयी प्रशासन आणि सरकार यांना काहीच वाटत नाही, त्यामुळे या स्थितीतही पालट होत नाही !

नाशिक – ओझर येथील चांदणी चौकात पोलिसांनी एका वाहनातून सहा जनावरांची सुटका केली. एका वाहनाद्वारे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने नेणार असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार चांदणी चौकात सापळा रचून पोलिसांच्या पथकाने धाड टाकून संशयास्पद वाहनामधून सहा जनावरांची सुटका केली.

या कारवाईत संशयित जावेद इस्माइल सय्यद, खलील कुरेशी, जुबेर कुरेशी, नवल गाडे यांना कह्यात घेतले. या संशयितांची कसून चौकशी करत अवैध पशूवधगृहाविषयी माहिती घेत तेथे पोलिसांनी धाड टाकली. तेथून दोन जनावरांची सुटका करण्यात आली. या पशूवधगृहातून १ सहस्र ९०० किलो गोवंशियांचे मांस जप्त करण्यात आले. येथील १३ संशयितांना पोलिसांनी अटक केली. सर्व संशयितांविरुद्ध ओझर पोलीस ठाण्यात राज्य प्राणी संरक्षक कायदा आणि भारतीय प्राणी संरक्षक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये १ जीप, १ ओमनी, १ कार असा १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.