UP Conversion Racket : लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – धर्मांतर करणार्‍या टोळीतील ७ जणांना अटक !

  • मूळचा हिंदु असलेल्या पाद्र्याने ख्रिस्ती मुलीच्या प्रेमात पडून धर्मांतर केले

  • ३ दशकांपासून करत आहे भोळ्याभाबड्या हिंदूंचे धर्मांतर

अटक करण्यात आलेले आरोपी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील मोहनलालगंज भागात धर्मांतर घडवून आणणार्‍या एका आंतरराज्यीय टोळीच्या कारवाया उघड करण्यात आल्या. पोलिसांनी या प्रकरणातील टोळीचा मुख्य सूत्रधार डॅनियल आणि त्याच्या पत्नीसह ७ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून धार्मिक साहित्य, धर्मांतराची पुस्तके, बँक पासबूक, चारचाकी गाडी आणि एक डायरी जप्त केली.

पोलीस उपायुक्त रल्लापल्ली वसंत कुमार यांनी दिलेली धक्कादायक माहिती !

१. या टोळीचा मुख्य सूत्रधार डॅनियल याचे मूळ नाव बाला सुब्रह्मण्यम् होते. तो मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे. तो १६ वर्षांचा असतांना तो सुबला नावाच्या ख्रिस्ती तरुणीच्या प्रेमात पडला. तिच्या सांगण्यावरून त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. (केवळ मुसलमान तरुणीच नव्हे, तर ख्रिस्ती तरुणीही हिंदु तरुणांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

२. विवाहानंतर डॅनियलने तामिळनाडूच्या एफ्.जी.पी.सी. चर्चच्या सांगण्यावरून धर्मांतराचे काम चालू केले. वर्ष १९९८ मध्ये या दांपत्याला लक्ष्मणपुरीला पाठवण्यात आले. डॅनियलला वाराणसी प्रांताचा पाद्री म्हणून दायित्व देऊन प्रतिवर्षी अधिकाधिक लोकांचे धर्मांतर करण्याचे वार्षिक उद्दिष्ट दिले जायचे. त्या बदल्यात चर्चकडून मोठा निधी पाठवला जात असे.

३. ही टोळी गरीब आणि हतबल गावकर्‍यांना लक्ष्य करायची. गुडघेदुखी बरी करणे, असाध्य आजारांवर उपचार, आर्थिक अडचण दूर करणे, विवाह जुळवून देणे आणि मूल होण्याचे आमीष दाखवून ‘प्रार्थना सभे’च्या नावाखाली लोकांचे ब्रेनवॉश केले जायचे.

कसा झाला खुलासा ?

मोहनलालगंजमधील भरसवा गावातील रहिवासी अमित कुमार यांनी या प्रकाराला विरोध केला, तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. आरोपींनी जेव्हा त्यांच्यावर धर्म पालटण्यासाठी दबाव आणला आणि असभ्य वर्तणूक करत गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली, तेव्हा गावकर्‍यांचा संताप अनावर झाला. त्यांनी २२ जुलैला या प्रकरणात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण टोळीच्या सदस्यांना अटक केली.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा असूनही धर्मांतराचे प्रकार अव्याहत चालू आहेत. त्यामुळे केवळ कायदा करून उपयोग नाही, तर त्यात मृत्यूदंडाचे प्रावधान केले पाहिजे. यानेच भोळ्याभाबड्या हिंदूंच्या धर्मांतरावर आळा बसू शकेल !