Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न

तथाकथित अदीना मशिदीजवळ चालू केली पूजा

आदिनाथ मंदिर

मालदा (बंगाल) – मालदा जिल्ह्यातील पांडुआ येथे असलेल्या अनुमाने ६५० वर्षे जुन्या तथाकथित अदीना मशिदीजवळ भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या पाठिंब्याने एका हिंदु संघटनेने पूजा करणे चालू केले आहे. ‘आदिनाथ पुरातन शिव मंदिर’ संघटनेने घोषित केले की, ते मशीद परिसराबाहेर ३.६ फूट उंच आणि अनुमाने १.५ टन वजनाचे शिवलिंग स्थापन करतील. हे शिवलिंग तारकेश्वर येथून आणले जात आहे, जे येथून सुमारे २८९ किलोमीटर अंतरावर आहे.

आदिनाथ मंदिर पाडून बांधण्यात आली मशीद

संघटनेचे मुख्य संरक्षक आणि भाजपचे नेते श्री. काजोल गोस्वामी म्हणाले की, या तथाकथित मशिदीत हिंदु आणि बौद्ध धर्मांच्या मूर्ती आहेत. आदिनाथ मंदिर पाडून येथे मशीद बांधण्यात आली होती. मंदिर पुन्हा स्थापन करणे आणि शिवलिंग त्याच्या आत ठेवणे, हा आमचा उद्देश आहे. आमची संघटना कायद्याचे पूर्ण पालन करेल. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग आणि पोलीस अधिकारी यांनी त्यांना संरक्षित स्मारक क्षेत्राच्या बाहेरच पूजा करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुरातत्त्व विभागाकडून नियमावली प्रसारित

या घडामोडींनंतर मालदा जिल्हा पोलिसांनी कठोर नियमावली प्रसारित केली. पोलिसांनी लोकांना आठवण करून दिली की, अदीना स्मारक वर्ष १९५८ च्या प्राचीन ‘स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायद्यां’तर्गत केंद्र सरकारद्वारे ‘संरक्षित स्मारक’ घोषित आहे. त्यामुळे परिसराच्या आत अनुमतीविना कोणत्याही प्रकारची पूजा किंवा धार्मिक विधी करण्यास पूर्णपणे बंदी आहे.

भाजपने संसदेत उपस्थित केले सूत्र

भाजपचे राज्यसभेतील खासदार समित भट्टाचार्य यांनी संसदेत हे सूत्र उपस्थित करत केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांच्याकडे मूळ आदिनाथ मंदिराच्या संरक्षणाकडे लक्ष देण्याची मागणी केली. दुसरीकडे माकपच्या कार्यकारिणीचे सदस्य महंमद सलीम यांनी आरोप केला की, भाजप आगामी निवडणुकीपूर्वी लोकांना विभागण्यासाठी त्याची जुनी राजकीय रणनीती वापरत आहे.

आदिनाथ मंदिराचा इतिहास

अदीना मशिदीविषयी सरकारी दस्तऐवजांमध्ये नोंद आहे की, तिचे बांधकाम वर्ष १३७३ ते १३७५ या काळात सुलतान सिकंदर शाह याने केले होते. तथापि अनेक पुरातत्त्वीय आणि वास्तुकलाविषयक पुरावे दर्शवतात की, या ठिकाणाचा इतिहास त्याहून अधिक जुना आहे. याचे बांधकाम प्रामुख्याने पाल-सेन काळातील (८ व्या ते १२ व्या शतकातील) पूर्वअस्तित्वात असलेल्या हिंदु आणि बौद्ध धार्मिक स्थळांवरून आणलेले दगड, खांब अन् कोरीव साहित्य यांचा वापर करून केले गेले होते. मशिदीत असलेल्या अनेक मूर्ती आणि इतर अवशेष दर्शवतात की, येथे पूर्वी भव्य आदिनाथ मंदिर अन् भगवान विष्णूचे एक मंदिर अस्तित्वात होते. मशिदीचा मिंबर (जिथून इमाम संबोधन करतात) देखील काळ्या बेसाल्ट दगडाने बनवलेल्या अशाच एका दरवाजाचा वापर करून बनवला गेला आहे, जो मंदिराच्या अवशेषांमधून घेतला गेला होता. येथील भिंती, दरवाजे आणि कमानी यांवर भगवान शिव, भगवान गणेश आणि इतर हिंदु प्रतीके यांची नक्षीकामे दिसतात. येथे फुलांच्या आकृत्या, चैत्य कमानी, कीर्तीमुख, मोत्यांच्या माळा आणि साखळी-घंटी यांसारख्या अनेक नक्षीही आहेत. अशा प्रकारचे सुशोभन सामान्यतः इस्लामी वास्तुकलेचा भाग मानले जात नाही. त्यामुळे हे नक्षीकाम आणि रचना पाल-सेन काळातील असल्याचे मानले जाते. आजही या परिसरात आणि त्याच्या आसपासच्या भिंतींमध्ये तुटलेले शिवलिंग आणि उलथून पडलेल्या हिंदु देवतांच्या मूर्ती दिसतात.

अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिले होते पत्र

ज्येष्ठ अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांनी हिंदूंना या स्थळावर पूजा करण्याचा अधिकार परत मिळवण्याचे आवाहन केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सुलतान सिकंदर शाहच्या राजवटीत झालेल्या ऐतिहासिक विध्वंसाचे सूत्रही उपस्थित केले.