भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची कारगिल विजय दिनानिमित्त पाकवर कठोर टीका

(सेमीकंडक्टर म्हणजे संगणक किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांमध्ये वापरली जाणारी सूक्ष्म चिप)

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

द्रास (लडाख) – भारत नवनवीन कल्पनांचे मार्ग शोधत आहे, तर पाकिस्तान घुसखोरीचे मार्ग शोधत आहे. भारत नौकांची रचना करत आहे, तर पाकिस्तान आतंकवाद्यांच्या रचनेमध्ये गुंतलेला आहे. भारत ‘स्टार्टअप (नवोदितांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात व्यवसाय चालू करणे) इकोसिस्टम’ (एखादी विचारसरणी पद्धतशीरपणे पुढे रेटणारी यंत्रणा) उभारत आहे, तर पाकिस्तान आतंकवादी इकोसिस्टम उभारत आहे. भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी २७ व्या कारगिल विजय दिनानिमित्त येथील कार्यक्रमात पाकवर कठोर टीका केली.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, भारत अवकाश मोहिमांसाठी ओळखला जात आहे, तर पाकिस्तान ‘प्रॉक्सी’ मोहिमा चालवत आहे. भारत अंतराळात उपग्रह पाठवत आहे, तर पाकिस्तान आजही आतंकवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्याचे काम करत आहे. भारत जगाला सॉफ्टवेअर देत आहे, तर पाकिस्तान जगाला ‘स्लीपर सेल’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांध मुसलमानांचे स्थानिक गट) देत आहे. भारत ‘डेटा सेंटर’ (माहिती केंद्र) बनवत आहे, तर पाकिस्तान ‘रेडिकल सेंटर’ (हिंसक किंवा टोकाच्या विचारसरणीचा स्वीकार करून ती साध्य करण्यासाठी हिंसा योग्य आहे, असे मानणार्‍यांचे केंद्र) बनवत आहे. भारत एआय(कृत्रिम बुद्धीमत्ते)द्वारे जगाला जोडत आहे, तर पाकिस्तान हवालाद्वारे आतंकवादाला जोडत आहे. हे स्पष्ट आहे की, आपले मार्ग वेगवेगळे आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तान त्याचे नीच हेतू घेऊन आपल्या समृद्धीच्या मार्गात अडथळे निर्माण करत असेल, तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी आपल्या सेना सज्ज आहेत.

पाकशी कोणतीही चर्चा करणार नाही !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही. जर चर्चा झालीच, तर ती केवळ पाकिस्तानच्या कह्यात असलेल्या काश्मीरवर होईल, जो भारताचा अविभाज्य भाग आहे आणि ज्यावर पाकिस्तानने अवैधपणे नियंत्रण मिळवलेले आहे.

संपादकीय भूमिका

  • पाक काय करत आहे ?, हे जगाला ठाऊक आहे; मात्र भारत त्याला मुळासह नष्ट करू शकलेला नाही किंवा तेथील आतंकवाद्यांना नष्ट करू शकलेला नाही, हे जगजाहीर आहे !
  • भारताने कितीही प्रगती केली, तर भारताचे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आजही पाकपुरस्कृत आतंकवाद्यांच्या सावटाखाली साजरे करावे लागतात, हेही तितकेच सत्य आहे !