८९ जणांना जामीन संमत; ठाणे न्यायालयाचा निर्णय

पालघर येथे झालेले साधूंचे हत्याकांड प्रकरण

ठाणे, १६ जानेवारी (वार्ता.) – पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल या दिवशी जमावाने केलेल्या आक्रमणात २ साधू आणि त्यांचा वाहनचालक अशा तिघांची हत्या झाली होती. या प्रकरणी १६ जानेवारीला ठाणे न्यायालयाने ८९ जणांना जामीन संमत केला आहे. घटना घडली, त्या वेळी घटनास्थळी हे ८९ जण केवळ उपस्थित होते, असे म्हणून प्रत्येकी १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन संमत केला आहे.

देशभर चर्चेत आलेल्या या तिहेरी हत्याकांड प्रकरणी २४८ आरोपींना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण हाताळत असतांना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाचे अन्वेषण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील २ पोलीस अधिकारी आणि ३ कर्मचारी यांचे निलंबन, तसेच ३५ कर्मचार्‍यांचे जिल्ह्यात अन्य ठिकाणी स्थानांतर (बदली) करण्यात आले आहे.