तृणमूल काँग्रेसविरुद्ध आणि भाजपला मत दिले, तर रक्ताचे पाट वहातील ! – बंगालमध्ये भिंतीवर धमकी !

बंगालमध्ये लोकशाहीचे तीनतेरा वाजवण्यात आले आहेत, हेच या धमकीतून उघड होते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती पहाता या धमकीनुसार उद्या काही घडले, तर आश्‍चर्य वाटू नये; म्हणून त्यापूर्वीच येथील सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे; मात्र त्यापूर्वीच भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात राजकीय संघर्ष चालू झाला आहे. याच पार्श्‍वभूमीवर नाडिया जिल्ह्यात एका भिंतीवर नागरिकांना धमकी देणारी एक सूचना लिहिण्यात आलेली दिसली. ‘तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिले गेले, तर रक्ताचे पाट वहातील. भाजपला एकही मत दिले, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील’, असे बंगाली भाषेत लिहिण्यात आले आहे. ही धमकी कुणी लिहिली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भागात भाजपचे जगन्नाथ सरकार हे खासदार, तर तृणमूलचे अरिंदम भट्टाचार्य आमदार आहेत.

१. नाडियातीला या धमकीपूर्वी १९ डिसेंबरच्या रात्री उत्तर २४ परगना जिल्ह्यातील बरेकपूरमध्ये काही जणांकडून भाजपच्या एका कार्यालयाला आग लावण्यात आली होती. त्यामुळे या भागातही तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या भागातील तृणमूलचे आमदार शीलभद्र दत्त यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही घटना घडली.

२. सध्या भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा २ दिवसांच्या बंगाल दौर्‍यावर आहेत. त्यांनी मिदनापूर येथील सभेला मार्गदर्शनही केले.