सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन!

२९ जुलै २०२६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्ताने...

नामजप किंवा आध्यात्मिक स्तरावरील उपाय करतांना अयोग्य कर्म टाळता आल्याने प्रारब्ध न्यून होत जाते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

कु. गौरी धामणकर, पुणे : नामजप किंवा आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने आपले सगळे आजार बरे होतात का ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : शास्त्रात कसे असते ? जे आपल्या जीवनात घडते, ते सगळे प्रारब्धानुसार घडते. ६५ टक्के घटना प्रारब्धानुसार होतात. ३५ टक्के घटना आपल्या क्रियमाणामुळे, म्हणजे आपल्या चुकांमुळे होतात. ज्या आपल्या चुकांमुळे होतात, त्या आपल्याला कशा घालवता येतील ? बुद्धीने विचार केला. आता समजा धरून चल, समाजात कुठली तरी एक साथ आली आहे. बाहेर जाऊन काही खायचे नाही वगैरे असे आहे. तरीसुद्धा कुणी बाहेर गेला आणि बुद्धीकडे लक्ष न देता बाहेरचे खाल्ले, तर त्याला आजार होणार आणि बाकीचे जे आहे ६५ टक्के ते प्रारब्धानुसार. ते टाळता कसे येतील ? आपण जर नामजप, साधना वगैरे करत राहिलो, तर हळूहळू आपले प्रारब्धच न्यून होत जाते. प्रारब्ध न्यून झाले की, आजार होणार नाही किंवा त्रासही होणार नाही. सगळ्यांनीच दोन्ही उपाय केले पाहिजेत.

साधकांमध्ये अहंभाव नसला आणि त्यांनी भावपूर्ण कृती केली की, देवता साहाय्याला येतात !

सौ. पल्लवी पाटील (पूर्वाश्रमीच्या पल्लवी मठपती): गुरुमाऊली, जेव्हा मी ‘ब्रह्मोत्सवा’नंतर हुब्बळ्ळीला गेले, तेव्हा माझा पहिला वर्ग होता, जो मी ‘कन्नड’ भाषेमध्ये घेणार होते. तेव्हा मला थोडा ताण आला होता; कारण ताईने सांगितले की, ‘शक्य होईल तेवढे कन्नड बोल. त्यांना हिंदी येत नाही.’ मी जेव्हा त्या गावात गेले, तेव्हा मला अधिक आनंद अनुभवायला मिळाला. हनुमंताने कसे आपल्या छातीत भगवान रामाला दाखवले, तसे मी माझ्या हृदय मंदिरामध्ये तुम्हाला, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना बसवले अन् समोर हनुमंत आहे. ‘आता मी प्रशिक्षण घेणार नाही, तर आता जे घेणार ते तोच घेणार’, असा भाव ठेवला. तिकडे जाऊन मी सगळे कन्नड भाषेतच बोलले. क्वचितच हिंदी भाषेत बोलले. त्या मुलींनाही इतके आवडले की, त्या आता प्रत्येक रविवारी दूरभाष करून प्रशिक्षण घ्यायला मलाच ये म्हणतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छान !

सौ. पल्लवी पाटील : म्हणजे माझ्या माध्यमातून तुम्ही सगळे करून घेत आहात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हे कसे असते ? सत्संग घेतांना ‘मी बोलणार आहे’, असा अहंकार असला की, काहीच साध्य होत नाही. सत्संग घेणार्‍याच्या मनात ‘आपण साधना करतो, तर सत्संगातील जिज्ञासूंच्या मनातील कळावे’, असा विचार असेल, तर देव सर्वज्ञानी असल्याने त्याला त्यांच्या मनातील शंकाप्रमाणे उत्तरे सुचवतो. सत्संग घेणार्‍याचा ‘मी बोलत नसून देवच माझ्या मुखातून बोलणार आहे’, असा भाव असेल, तर सत्संग घेणारा, जिज्ञासूंच्या शंका आणि त्यांना दिली जाणारी उत्तरे यांत सुसंवाद साधला जाऊन त्याचा परिणाम चांगला साधला जातो. सत्संग घेतांना आपला जसा भाव असेल, तसे आपल्याला फळ मिळते. तू खूपच छान विचार केलास !