‘मारक विचारसरणी’ मुळापासून उपटून टाकण्यासाठी एकत्र काम करा ! – India At UN

संयुक्त राष्ट्रांत भारताने आतंकवादावरून सुनावले !

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश

न्यूयॉर्क (अमेरिका) – आतंकवादाला मिळणार्‍या आर्थिक साहाय्याचा सामना करणे, हा जागतिक समुदायाच्या सामूहिक प्रयत्नांचा एक भाग असायला हवा. आंतरराष्ट्रीय समुदायाने आतंकवादाचे समर्थन करण्यासाठी कोणत्याही तक्रारीचा आधार न घेता, ही ‘मारक विचारसरणी’ मुळापासून उपटून टाकण्यासाठी एकत्र काम करावे, असे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रांत केले.

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत हरीश पर्वथनेनी म्हणाले की, भारत गेल्या अनेक दशकांपासून सीमेपलीकडील आतंकवादाचा शिकार ठरला आहे. यासाठी आम्ही मोठी किंमत चुकवली आहे. अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले, तसेच कुटुंबे उद्ध्वस्त झाली. याच अनुभवातून भारताची ही भूमिका बनली आहे की, आतंकवादाचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही. कोणतीही तक्रार, राजकीय उद्दिष्ट किंवा धोरणात्मक समीकरणे असली, तरी आतंकवादाची सर्व रूपे आणि पद्धत यांचा कोणत्याही संकोचाविना निषेध केला पाहिजे. सदस्य देशांनी या संदर्भात पूर्ण सहकार्य केले पाहिजे. आंतरराष्ट्रीय समुदायाने आतंकवादाचा सामना करतांना दुटप्पी निकष लावणे टाळले पाहिजे. आतंकवादी कारवाया करणारे, कट रचणारे, त्यांना आर्थिक साहाय्य पुरवणारे आणि त्यांचे प्रायोजक यांना उत्तरदायी धरून आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे अत्यंत आवश्यक आहे.