परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकणे म्हणजे, ईश्वर, देवता यांच्यासह वाईट शक्तींचाही अभ्यास असणे आवश्यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘बहुतांश संत, संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था अध्यात्म शिकवतांना केवळ ईश्वर, देवता, साधनामार्ग यांच्याबद्दलच सांगतात. त्यांच्या शिकवण्यात वाईट शक्तींचा उल्लेखही नसतो; किंबहुना त्याबद्दल त्यांना माहितीही नसते. जसे १ दिवस म्हटले की, त्यामध्ये दिवस आणि रात्र या दोन्हीचा समावेश असतो, तसे परिपूर्ण अध्यात्मात ईश्वर, देवता यांच्यासह वाईट शक्तींचीही माहिती असणे आवश्यक असते. अन्यथा वाईट शक्तींचा आपल्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम होतो अन् त्यावर उपाय काय, हेच ठाऊक नसल्यामुळे केलेली साधना त्यातच खर्च होते. त्यामुळे केवळ ईश्वर अन् देवता यांच्याबद्दल एकांगी अध्यात्म शिकवणे, हे बालवाडीच्या स्तरावरील अध्यात्म होते. म्हणूनच वेदांमध्येही त्याला स्वतंत्र स्थान दिले आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, मुलांवर गुरूंप्रमाणे संस्कार करा !

‘हल्ली एखाद्या घरामध्ये २-३ मुले असली, तरी पालकांना खात्री नसते की, मुले त्यांच्या म्हातारपणी त्यांचा सांभाळ करतील. मुलांमध्येही मतभेद असतात. याउलट एखाद्या गुरूंच्या आश्रमात ५०-१०० शिष्य असतात. ते सर्वच गुरूंवर स्वतःहून अधिक प्रेम करतात. याचा अर्थ पालकांनी त्यांच्या मुलांवर गुरूंप्रमाणे संस्कार करणे आवश्यक आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.