महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवला

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे, तसेच पावसाळ्यातील खराब हवामानामुळे मासेमारांची जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी राज्यशासनाने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी जो १ जून ते ३१ जुलैपर्यंत होता, तो आता १५ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. मासेमारी हंगामाच्या प्रारंभी लहान माशांची केली जाणारी मासेमारी रोखण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा, अशी मागणी विविध मासेमारी सहकारी संस्थांकडून शासनाकडे करण्यात आली होती. या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा समिती, तसेच राज्य सल्लागार आणि सनियंत्रण समितीचे अहवाल मागवण्यात आले. या समित्यांनीही बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा अभिप्राय दिला. राज्यात बंदी लागू असतांना इतर राज्यांतील मासेमारी नौका महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊन अनधिकृत मासेमारी करत असल्यास त्यांच्याविरुद्ध मत्स्यविभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

इंग्रजी दिनांकाप्रमाणे नाही, तर आपल्या पूर्वजांनी पूर्ण अभ्यास करून ठरवल्याप्रमाणे पावसाळा चालू झाल्यावर नारळी पौर्णिमेपर्यंत म्हणजे श्रावण पौर्णिमेपर्यंत मासेमारी बंदी हवी ! नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर तो शांत झाल्यावर मासेमारीसाठी समुद्रात जाणे सुरक्षित असते !