Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !

आतंकवाद्यांनी अपहरण, सामूहिक बलात्कार आणि अमानुष छळ केल्यानंतर गोळ्या झाडून केल्या होत्या हत्या !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमधील अनंतनाग येथील हिंदु परिचारिका सरला भट यांचे ३६ वर्षांपूर्वी झालेले अपहरण, सामूहिक बलात्कार, अमानुष छळ आणि नंतर गोळ्या झाडून हत्या केल्याच्या प्रकरणी काश्मीर पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ७३७ पानांचे आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे. या कृत्यात ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’चा (‘जेकेएलएफ्’चा) प्रमुख असणारा आतंकवादी यासीन मलिक हाही आरोपी आहे.

यासिन मलिक सध्या दुसर्‍या एका प्रकरणात देहलीतील तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, तर अन्य ४ आरोपींचा मृत्यू झाला आहे. खुर्शीद अहमद चालकू हा पसार असून तो पाकिस्तानात असल्याचे सांगितले जाते.

‘जेकेएलएफ’च्या आतंकवाद्यांनी १८ एप्रिल १९९० या दिवशी ‘शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’जवळून सरला भट यांचे अपहरण केले होते. आतंकवाद्यांनी त्यांना ‘पोलिसांची खबरी’ म्हणजे ‘पोलिसांना माहिती देणारी’, ठरवले होते. काश्मीरमधील परिस्थिती सध्या सामान्य झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचे अन्वेषण चालू करून पुरावे गोळा केले आणि आरोपपत्र प्रविष्ट केले.

संपादकीय भूमिका

हे भारतियांना आणि आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! काश्मीरमध्ये अशा अनेक घटना आहेत, ज्यांचे अन्वेषण झालेले नाही किंवा आरोपपत्र प्रविष्ट होऊन कुणाला शिक्षाही झालेली नाही !