निजामाबाद (तेलंगाणा) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना उर्दू आणि कलमा शिकवण्याचा विरोध

भाजपच्या नेत्यासह २० लोकांवर गुन्हा नोंद

(कलमा म्हणजे अल्लाचा गौरव करणारी विधाने)

भाग्यनगर (तेलंगाणा) – निजामाबाद जिल्ह्यातील आर्मूर येथील एका खासगी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना उर्दू आणि ‘कलमा’ शिकवणे यांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी वेगवेगळ्या धार्मिक गटांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली शाळेचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक आणि उर्दू शिक्षिका यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. दुसरीकडे शाळेत घुसून कर्मचार्‍यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली भाजपच्या स्थानिक नेत्यासह सुमारे २० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना २७ जून या दिवशी ‘भारत चंद्रा स्कूल’मध्ये घडली. भाजपचे काही कार्यकर्ते आणि पालक यांनी शाळेत पोचून दावा केला की, हिंदु विद्यार्थ्यांना उर्दूच्या वर्गात इस्लामशी संबंधित ‘कलमा’ शिकवला जात आहे, असा आरोप करण्यात आला आहे. याच गोष्टीवरून शाळा परिसरात गदारोळ झाला.

शाळेचे मुख्याध्यापक आमेर खान यांचे म्हणणे आहे की, काही मुसलमान पालकांनी त्यांच्या मुलांना उर्दू शिकवण्याची मागणी केली होती. यानंतर नवीन शैक्षणिक सत्रात एका उर्दू शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली. शाळेत बांधकाम चालू असल्याने अतिरिक्त वर्गखोली उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत उर्दूचे अध्यापन त्याच खोलीत करण्यात आले, जिथे इतर धर्मीय विद्यार्थीही बसले होते. यामुळे काही हिंदु विद्यार्थ्यांनीही उर्दूची अक्षरे स्वतःच्या वहीत लिहून घेतली. काही पालकांचा ‘त्यांच्या मुलांना नमाजपठण करायला शिकवले जात आहे’, हा आरोप चुकीचा आहे. मुलांना केवळ उर्दू मुळाक्षरे ‘अलिफ, बे, ते’ शिकवली जात होती, कोणतीही धार्मिक कृती किंवा नमाजपठण करण्याचे शिक्षण दिले गेले नाही.

मुख्याध्यापकांनी, ‘तक्रारीच्या वेळी भाजपचे स्थानिक नेते वंदुला बालू त्यांच्या समर्थकांसह शाळेत आले आणि मला मारहाण केली. मला कानाखाली मारण्यात आली आणि धक्का देऊन खाली पाडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनीही माझ्याशी  योग्य वर्तन केले नाही आणि मला माझ्याच कार्यालयात बराच वेळ भूमीवर बसवून ठेवले’, असा आरोप केला आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु विद्यार्थ्यांना कलमा शिकवण्याचे धाडस मुसलमानांचे होते, याचा अर्थ हिंदू निद्रिस्त आहेत, हेच स्पष्ट होते !
  • अशा घटना थांबवण्यासाठी आणि हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य ठरले आहे !