अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अपहार ही अतिशय गंभीर घटना ! : Advocate Vishnu Shankar Jain

नवी देहली – श्रीराममंदिराची उभारणी केल्यानंतर आपण तेथे सर्वांनी प्रभु श्रीरामांची स्थापना केली. त्या वेळी सर्वांनी ‘हे संपूर्ण देशात एक आदर्श मंदिर व्हावे’, असा विचार केला होता. त्यामुळे त्य ाठिकाणी अपहाराची घटना घडणे, हे अतिशय गंभीर आहे. या घटनेचे सखोल अन्वेषण होईलच; पण अशा गोष्टी भविष्यात परत घडू नयेत, यासाठी तेथे एक विशेष व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे, असे मत सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केले.

अधिवक्ता विष्णु शंकर जैन पुढे म्हणाले की, मंदिर न्यासाच्या कोषाध्यक्षांनी नैतिकता म्हणून त्यागपत्र दिले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष अन्वेषण पथकाने गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना अन्वेषण अहवाल सादर केला आहे. अन्वेषण संस्था आता त्याचे अन्वेषण करतील. त्यात जे दोषी आढळतील, त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल आणि आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले जाईल. समजा त्यात एखाद्याचे नाव नसेल, तर ते पुरवणी आरोपपत्रात जोडता येईल.

मंदिरे सरकारच्या नियंत्रणातून मुक्त झाली पाहिजेत !

अधिवक्ता जैन म्हणाले की, सध्याच्या स्थितीत मंदिरे ही सरकारच्या नियंत्रणातून मुक्त झाली पाहिजेत. या पार्श्वभूमीवर येथे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि समाजातील विचारवंत यांचा सहभाग असतांना, जर अशा प्रकारचे आरोप समोर येत असेल, तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अतिशय गांभीर्याने झाले पाहिजे. भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी कशा प्रकारे व्यवस्था निर्माण केली पाहिजे ?, याचा विचार देशातील सर्व सरकारे आणि समाज यांनी करणे आवश्यक आहे.