Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा

भारत सरकारचे मौन

इटानगर (अरुणाचल प्रदेश) – राज्यातील ‘नाह’ आदिवासी समुदायाने अप्पर सुबनसिरी जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चीनने घुसखोरी केल्याचा दावा केला आहे. गेल्या ६ वर्षांत चिनी सैन्याने त्यांच्या गुरे चरण्याच्या, शिकारीच्या आणि शेती करण्याच्या पूर्वजांच्या भूमीच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवले आहे, असा या समुदायाचा दावा आहे. या संदर्भात नुकतेच अप्पर सुबनसिरीच्या उपायुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणी भारत सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.

‘नाह वेल्फेअर सोसायटी’चे अध्यक्ष केरू चाडर यांनी ५ ठिकाणी चीनच्या हालचाल होत असल्याचा आरोप केला आहे. संघटनेच्या मते, हे सर्व भाग अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील महसूल मंडळाच्या अंतर्गत येतात. चिनी सरकार धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांवर नियंत्रण मिळवून आंतरराष्ट्रीय सीमेवर त्याच्या नियंत्रणाचा सातत्याने विस्तार करत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणावर नाचोचे आमदार नाकाप नालो यांनी सांगितले की, हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला आहे, त्यामुळे याला अधिकृत दुजोरा मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाने या आरोपांची अधिकृत पडताळणी करावी. हा राष्ट्रीय महत्त्वाचा विषय असल्याने साहजिकच याविषयी गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

चीनने भारतीय सीमेत रस्ते आणि सैनिकी तळ उभारले

चिनी सैन्याने भारतीय सीमेमध्ये रस्ते आणि सैनिकी तळही बांधले असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. केरू चाडर म्हणाले की, आमचा आमच्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. आमचे सैनिक वर्षानुवर्षे आमच्या भूमीचे रक्षण करत आहेत; पण सध्याच्या परिस्थितीत त्यांचे प्रयत्न पुरेसे ठरतांना दिसत नाहीत. महसूल भागात चिनी सैन्याच्या हालचालींचा वेग आला आहे. त्यांचा उद्देश अत्यंत चिंताजनक आहे. ‘आपल्या पूर्वजांची भूमी हळूहळू आपल्या हातातून निसटत चालली आहे’, अशी भीती आम्हाला वाटत आहे.

संपादकीय भूमिका

सरकारने या दाव्याची चौकशी करून जनतेसमोर वस्तूस्थिती मांडावी !