‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !

  • वर्ष २०३० चे मोठे उद्दिष्ट वेळेच्या ५ वर्षे आधीच केले पूर्ण !

  • संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या अहवालात खुलासा

AI निर्मित चित्र

जिनेव्हा (स्विट्झरलंड) – जगभरात नौकांना मोडीत काढून त्यांचा पुनर्वापर  (रिसायकलिंग) करण्यात भारताने प्रथम स्थान पटकावले आहे. भारताने हे यश ‘मॅरिटाइम इंडिया व्हिजन २०३०’ चे उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या वेळेच्या ५ वर्षे आधीच पूर्ण केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या (‘यू.एन्.सी.टी.ए.डी’च्या)  अहवालानुसार जगातील एकूण नौका पुनर्वापर बाजारपेठेत भारताचा वाटा वर्ष २०२५ मध्ये वाढून ३५.४ टक्के झाला आहे. वर्ष २०२४ मध्ये हा वाटा ३०.१ टक्के होता. भारत आता या क्षेत्रात संपूर्ण जगाचे नेतृत्व करत आहे.

गुजरातमधील ‘अलंग यार्ड’चा होणार कायापालट !

भारतामध्ये गुजरात राज्यातील ‘अलंग’ हे जगातील सर्वांत मोठे नौका पुनर्वापर केंद्र (शिप रिसायकलिंग यार्ड) आहे. भारताला या क्षेत्रात मिळालेले मोठे यश टिकवून ठेवण्यासाठी सरकार आता गुजरातच्या ‘अलंग यार्ड’चा आणखी विस्तार करण्याच्या सिद्धतेत आहे. या विस्तारानंतर भारताची नौका मोडीत काढण्याची क्षमता जवळपास दुप्पट होणार आहे. भविष्यात येणारी मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी हे पाऊल अत्यंत उपयुक्त ठरेल.

भविष्यात होणार मोठी कमाई !

येत्या १० वर्षांत जगभरात अनुमाने १६ सहस्रांहून अधिक नौका मोडीत काढण्याची अपेक्षा आहे. बाजारपेठेवरील सशक्त पकडीमुळे भारत प्रतिवर्षी ५०० ते ६०० नौका सहज हाताळू शकतो. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील.