आयुर्वेदाचा अंगीकार करणे हा उपाय !

आयुर्वेद केवळ शरिराचीच नाही, तर मन आणि बुद्धीचेही उत्तम संगोपन व्हावे; म्हणून सात्त्विक अन्नाचा आग्रह धरते. असे म्हणतात की, आपण जसे खातो, तसे आपण होतो. सुदृढ मन, बुद्धी आणि शरीर हवे असल्यास उत्तम अन्न खाल्ले पाहिजे. त्याही पुढे जाऊन अन्नामध्ये कस येण्यासाठी कसदार भूमी असली पाहिजे. त्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आणि कीटकनाशक यांचा वापर टाळण्याचा आग्रह धरला पाहिजे. असे करत करत आयुर्वेदिक जीवनशैलीचा अंगीकार केला पाहिजे. तसे केल्यासच आपण जंक फूडच्या विळख्यातून बाहेर पडू. त्यासाठी आजच्या राज्यकर्त्यांनी तशी इच्छाशक्ती दाखवायला हवी, तरच एक सुदृढ आणि खर्‍या अर्थी प्रगल्भ पिढी निर्माण होईल.

(संदर्भ : दैनिक सनातन प्रभात)

जंक फूड त्यागणे आवश्यक !

जंक फूड हे आरोग्यास हानीकारक आहे, हे आतापर्यंत निरनिराळ्या संशोधनातून पुढे आले आहे. जंक फूड खाल्ल्याने बुद्धीदौर्बल्य येते, शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. आज जंक फूड खाण्यात तरुण पिढी, तर अग्रेसर आहेच; परंतु शाळकरी मुलेही त्यांच्या आहारी गेल्याचे निदर्शनास येते. सात्त्विक आणि पौष्टिक अन्न खाण्याचे संस्कारच हळूहळू लयास जातात कि काय, अशी भीती वाटण्याजोगे जंक फूडचे प्रस्थ वाढीस लागले आहे. जंक फूडचे प्राबल्य हे थांबवायचे असेल, तर केवळ महाविद्यालयांमध्ये त्यावर बंदी घालून विशेष साध्य होईल, अशी स्थिती नाही. मुले महाविद्यालयाच्या बाहेरील अथवा अन्यत्रच्या गाड्यांवरही त्याची खरेदी करून ते खाऊ शकतात. हे लक्षात घेऊन जंक फूड निर्मितीसच आणि देशभरातील सर्व जंक फूडच्या गाड्यांवर आळा बसला पाहिजे. जंक फूड हे शरिरासमवेत वैचारिक क्षमताही खिळखिळी करतात, हे लक्षात घेऊन या संदर्भातील उपाययोजना लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात)