भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव

भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ

नवी देहली – अमेरिकेने ओमानच्या आखातातील व्यापारी नौकेवर केलेल्या आक्रमणात ३ भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. यावरून आता भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढल्याचे चित्र आहे. भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने तीव्र निषेध नोंदवला असून या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय राजनैतिक संवाद चालू झाला आहे. यासह अमेरिकेने भारतीय खलाशी असलेल्या अन्य २ नौकांनाही लक्ष्य केल्याने भारताने तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे.

डॉ. जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना सुनावले !

भारतीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांना दूरध्वनीवर करून भारतीय खलाशांच्या मृत्यूविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. व्यापारी नौकांवर करण्यात आलेले आक्रमण अस्वीकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर भारताने अमेरिकी दूतावासातील वरिष्ठ अधिकार्‍यांना २ वेळा बोलावून निषेध नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमेरिकेची दादागिरी कायम !

यावर अमेरिकेने तिच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत हॉर्मुझ सामुद्रधुनीतील (२ जलाशयांना जोडणारा लहान जलमार्गातील) सर्व व्यापारी नौकांना अमेरिकी सैन्याच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रमुख उपप्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितले की, या भागात शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अमेरिकी सैन्य कार्यरत असून नाकाबंदीचे उल्लंघन केल्याचा प्रकार खपवून घेणार नाही.

भारतकडून संयुक्त राष्ट्रसंघांत सूत्र उपस्थित !

या घटनांनंतर भारताने हे सूत्र संयुक्त राष्ट्रसंघांत उपस्थित करून व्यापारी नौकांवरील आक्रमणांचा निषेध केला. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी भारतीय नौकांवरील आक्रमणांसाठी इराणला उत्तरयी ठरवले. इराणी ड्रोनद्वारे भारतीय जहाजांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला; मात्र इराणने तो फेटाळून लावला.