जेवढे रुपये कमवण्यासाठी आर्यभट्ट यांचा अवमान केला, तेवढे भारत सरकारने दंड म्हणून वसूल करावेत !

‘ॲमेझॉन इंडिया’ने विज्ञापनातून गणितज्ञ आर्यभट्ट यांचा अवमान केल्याचे प्रकरण

हिंदु संस्कृती, येथील विद्वान, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांचा अभिमान भारतियांच्या मनातून वा वर्तनातून नष्ट करण्यात अनेक वर्षांनी मिशनरी अन् पाश्चात्त्य विद्वान यशस्वी झाले आहेत. ‘ॲमेझॉन इंडिया’ने त्यांच्या विज्ञापनात गणितज्ञ आर्यभट्ट यांना आणून जे स्वत:च्या प्रसाराचे माध्यम बनवले, ते चुकीचे आहे. त्यांच्या विद्वत्तेचा अनादर करणारे आहे. ‘पाश्चात्त्य शिक्षणातूनच भारताचा उद्धार झाला, त्याआधी भारतात काही गणिती, खगोल, वैज्ञानिक काही नव्हतेच’, असे मानणारा भारतीय निर्माण करण्यातही मिशनरी आणि पाश्चात्त्य विद्वान यशस्वी झाले आहेत.

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

‘ॲमेझॉन इंडिया’तील माणसांनी ‘असे केले’ यापेक्षाही त्यांना ‘असे करावेसे वाटले’, हेच आम्ही अभिमानशून्य झालो आहोत’, याचे द्योतक आहे. ‘ॲमेझॉन इंडिया’ला बहिष्कृत करणे, क्षमा मागायला लावणे, हे योग्य उपाय नाहीत, तर जेवढे पैसे कमवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला, तेवढे दंड म्हणून भारत सरकारने वसूल करणे न्याय्य ठरेल. त्यांनी हे पैसे कमवण्यासाठी केले असल्यामुळे त्यांना कोट्यवधींचा दंड बसला पाहिजे; पण तेवढा दंड आकारण्याचा निकाल देणारा एक तरी न्यायाधीश संपूर्ण भारतात आहे का ? कि ‘आमचा अनादर करण्याचा हेतू नव्हता, तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो’, असे लिखित पत्र घेऊन ‘न्याय’ केल्याचे व्यवस्था म्हणेल ?

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (१३.६.२०२६)