भारताच्या शस्त्रांद्वारे युरोपवर कधीही आक्रमण झाले नाही; पण युरोप अशा देशांना शस्त्रे विकतो, ज्यांद्वारे भारतावर आक्रमणे होतात ! : External Affairs Minister Jaishankar

रशियन तेल खरेदी करत असल्याला विरोध केल्यावरून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची युरोपला जोरदार चपराक

परराष्ट्रमंत्री जयशंकर

नवी देहली – भारताच्या शस्त्रांद्वारे युरोपवर कधीही आक्रमण झाले नाही; पण युरोप अशा देशांना शस्त्रे विकतो, ज्यांद्वारे भारतावर आक्रमणे होतात, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी युरोपला जोरदार चपराक लगावली.

भारत रशियाकडून कच्चे तेल घेत असल्याने ‘भारताचा पैसा वापरून रशिया युक्रेनवर आक्रमण करत आहे’, असा आरोप युरोपीय देशांकडून केला जातो. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका केली.

भारत आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडत नाही !

भारत रशियाकडून सातत्याने कच्च्या तेलाची आयात का करत आहे ?, या प्रश्नाला उत्तर देतांना जयशंकर म्हणाले की, भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाला अथवा कथानकाला बळी पडत नाही. भारत केवळ इंधनाची किंमत आणि त्याची उपलब्धता या आधारांवरच तेल खरेदी करतो. अमेरिका आणि युरोपीय देश यांनी रशियावर निर्बंध लादल्यानंतर त्यांनी आखाती देशांकडून तेल खरेदी चालू केली. आखातातील देश हे भारताचे पारंपरिक तेल पुरवठादार होते. युरोपच्या या पावलामुळे भारताला आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी रशियाकडे वळावे लागले. विशेष म्हणजे अमेरिकेनेही एका टप्प्यावर भारताला जागतिक बाजारपेठेतील इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. भारत नेहमीच आपले राष्ट्रीय हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेईल, असे परराष्ट्रमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.