India Nuclear Weapons : भारताकडे अपेक्षेपेक्षा पुष्कळ अधिक अण्वस्त्रे असू शकतात ! – पाकिस्तान

‘सिप्री’च्या अहवालामुळे पाकची वाढली चिंता

(सिप्री म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट)

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘सिप्री’च्या अनुमानापेक्षा भारताकडे कितीतरी अधिक अण्वस्त्रे असू शकतात, अशी भीती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे. जागतिक स्तरावरील अण्वस्त्रे आणि संरक्षण प्रणाली यांवर अभ्यास करणार्‍या ‘सिप्री’ या संस्थेने नुकत्याच प्रसारित केलेल्या तिच्या अहवालात म्हटले की, २ वर्षांपूर्वीपर्यंत भारतापेक्षा पाककडे अधिक अण्वस्त्रे होती; परंतु आता भारताने गरुडभरारी घेतली आहे. गेल्या वर्षात भारताने १० अण्वस्त्रांची निर्मिती केली. यामुळे भारताचा अण्वस्त्र साठा वेगाने वाढून १९० पर्यंत पोचला असून पाककडील अणवस्त्रांची संख्या १७० वरच स्थिर आहे. भारताने १९० पैकी १२ क्षेपणास्त्रे मारा करण्याच्या सिद्धतेत ठेवली आहेत. ‘सिप्री’च्या अहवालामुळे पाक धास्तावला आहे. भारताला वारंवार अणूयुद्धाची धमकी देणार्‍या पाकने भारताच्या विस्तारणार्‍या अण्वस्त्र क्षमतेच्या परिणामांविषयी चिंताही व्यक्त केली.

पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने मान्य केले की,

१. भारताची सामरिक क्षमता विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने विस्तारत आहे. भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालींमधील घडामोडींची उदा. ‘कॅनिस्टरायझेशन’ (संरक्षक कंटेनरमध्ये क्षेपणास्त्रे ठेवण्याचे तंत्र), तसेच अण्वस्त्र वाहून नेणार्‍या पाणबुड्यांद्वारे समुद्रातून अण्वस्त्रांचा मारा करण्याची क्षमता वाढवणे आणि अधिक पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालींचा विकास करणे आदींची आम्हाला जाणीव आहे.

२. या घडामोडींमुळे भारताची ‘कार्यरत सज्जता’ (ऑपरेशनल रेडिनेस) वाढत आहे.