अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !

  • परिवहनमंत्र्यांची बसस्थानकाला अचानक भेट

  • विभाग नियंत्रक अन् आगार व्यवस्थापक निलंबित !

  • प्रवासी आणि चालक-वाहक यांच्या आरोग्याशी तडजोड करणार नसल्याचे आश्वासन !

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (उजवीकडे)

अमरावती – राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ७ जूनच्या रात्री १०.१५ वाजता अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट दिली. शिवसेनेच्या मेळाव्याहून परततांना ते बसस्थानकात आले. यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची तारांबळ उडाली. या वेळी त्यांनी बसस्थानकातील अंतर्गत व्यवस्था आणि प्रवासी सुविधा यांचा आढावा घेतला. बसस्थानक परिसरातील अस्वच्छता पाहून ते प्रचंड संतापले. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनी विभाग नियंत्रक सचिन डफळे आणि आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

महामंडळाकडून प्रत्येक तिकिटावर प्रत्येकी २ रुपये ‘स्वच्छता कर’ आकारला जाऊनही बसस्थानक परिसरातील अस्वच्छता, तसेच चालक-वाहकांसाठीचे विश्रामगृह आणि स्वच्छतागृह यांची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री संतप्त झाले.

१. चालक-वाहकांसाठीच्या विश्रांतीगृहात काही गाद्या आणि सतरंज्या पडलेल्या होत्या.  या वेळी शिवसेनेच्या एका पदाधिकार्‍याने सांगितले, ‘‘गाद्या आणि वायूशीतकरण यंत्र (कूलर) आजच आणले आहे.’’

२. सरनाईक यांनी चालक-वाहकांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘येथे केवळ सतरंज्या असतात. स्वच्छता केली जात नाही. एकच कूलर असतो. बाहेरील चालक येऊन येथे झोपतात. बसचालक आणि वाहक यांना पिण्यासाठी थंड पाणी मिळत नाही, तसेच अंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही.’’

३. हे ऐकून संतप्त झालेल्या प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकावरील ढिसाळ व्यवस्थापनाविषयी अधिकार्‍यांना जाब विचारला. (चालक आणि वाहन यांच्या प्रती असंवेदनशील असलेले बसस्थानक प्रशासन ! – संपादक)

४. ‘प्रवासी आणि चालक-वाहक यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही’, असे प्रताप सरनाईक यांनी या वेळी सांगितले.