भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता

प्रतिकात्मक चित्र

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारताचे प्रजनन प्रमाण अनेक वर्षांपूर्वीच सुशिक्षित वर्गामध्ये पुनरुत्पादन पातळीच्या खाली आले आहे. भारताचे एकूण प्रजनन प्रमाण घटून अनुमाने १.९ वर आले आहे, तर  पुनरुत्पादन प्रमाण २.१ मानले जाते. यामुळे याचा दीर्घकाळात लोकसंख्येच्या रचनेवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता ‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’ आस्थापनांचे मालक इलॉन मस्क यांनी एका पोस्टद्वारे व्यक्त केली. त्यांनी यासाठी एका अहवालाच संदर्भ दिला आहे.

अहवालात दावा करण्यात आला आहे की, देहलीतील प्रजननाचे प्रमाण घटून अनुमाने १.२ पर्यंत पोचले आहे, जो अनेक विकसित देशांपेक्षाही अल्प मानला जात आहे. तज्ञांच्या मते, शहरी भागांत शिक्षण, जीवनशैली आणि आर्थिक कारणे, यांमुळे कुटुंबाचा आकार सातत्याने लहान होत आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातही माहिती

संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट २०२५’ मध्येही असे नमूद करण्यात आले आहे की, भारताचे प्रजननाचे प्रमाण २.१ च्या खाली घसरून १.९ वर आले आहे. भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे; परंतु असे असूनही लोकसंख्या वाढीचा वेग हळूहळू अल्प होत आहे.