रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिर झाले. त्या शिबिरात उपस्थित असलेल्या साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

 १. सौ. नीता चव्हाण, नवीन पनवेल, जिल्हा रायगड. 

अ. ‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्हा मी गुरूंना आर्ततेने प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, माझी पात्रता नाही, तरीही मला येथील चैतन्य अनुभवता येऊ दे.’ तेव्हा थोड्या वेळाने माझे मन एकदम शांत झाले.

आ. ‘ध्यानमंदिरातील गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) छायाचित्राभोवती असलेल्या पांढर्‍या रंगाच्या प्रभावळीत वाढ होऊन ती विशाल झाली आहे,’ असे मला सूक्ष्मातून दिसले. ‘माझे हृदयही विशाल झाले आहे’, असे मला जाणवले.

इ. ‘या स्थितीतून बाहेर पडूच नये’, असे मला वाटत होते. मी ही स्थिती १५ मिनिटे अनुभवत होते.’

२. सौ. स्नेहल पाटील, रायगड

अ. ‘वर्ष २०२५ च्या गुरुपौर्णिमा उत्सवापासून माझ्या पायाला बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन) झाला होता. मी ७ मास आधुनिक वैद्यांचे उपचारही घेतले. तेव्हा काही दिवस मला त्रास होत नव्हता; मात्र नंतर मला पुन्हा कंड येत होती. मी आश्रमात शिबिराच्या निमित्ताने आल्यावर ती जखम पूर्णपणे बरी झाली. तेव्हा मला वाटले, ‘गुरुदेवांची किती कृपा आहे !’

आ. माझ्या हाताच्या बोटाला दुखापत होऊन तेथे १० टाके पडले होते. रुग्णालयात २ मास उपचार घेऊनही ती जखम पूर्ण बरी होत नव्हती. मी आश्रमात आल्यावर ३ दिवसांतच ती जखम पूर्ण सुकली.

इ. एकदा शिबिरात सौ. अर्पिता पाठक विषय मांडत असतांना ‘त्यांच्या डोळ्यांभोवती पांढर्‍या रंगाचे वलय आहे’ आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्याच्या वलयामुळे सौ. अर्पिताताईंच्या चेहर्‍यावर पुष्कळ तेज दिसत आहे’, असे मला जाणवले. नंतर एकदा त्या बोलत असतांना ‘पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या समष्टी संत, वय ५६ वर्षे) बोलत आहेत,’ असे मला जाणवले.

३. श्री. विनायक कांगणे, चिपळूण, रत्नागिरी. 

अ. ‘आश्रमाच्या सभागृहात प्रवेश करत असतांना मी एका निर्वात पोकळीत हळूहळू एकेक पाऊल पुढे टाकत आहे’, असे मला जाणवत होते.

आ. माझे मन निर्विचार झाले होते.

इ. शिबिराच्या आरंभी प्रार्थना करत असतांना मला गुरुदेवांचे स्मरण होऊन माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. ‘गुरुदेव माझ्यासाठी किती करत आहेत !’, असे मला वाटत होते. त्या वेळी मला व्यासपिठावर प.पू. गुरुमाऊलींचे विशाल रूप दिसले. मी प्रार्थना करत असतांना ‘गुरुदेवांचा आशीर्वादरूपी हात साधकांवर आहे’, असे मला जाणवत होते.

ई. शिबिराची सांगता होईपर्यंत मला गुरुदेवांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवत होते.’

४. सौ. शैलजा कट्टी, पलूस, सांगली. 

अ. ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मला भूवैकुंठात (रामनाथी आश्रमात) यायला मिळाले’, याबद्दल माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

आ. शिबिरात येण्याच्या आधीपासून ते शिबिर संपेपर्यंत मला सतत गुरुदेवांची आठवण येत होती.

इ. पहिल्या दिवशी भावजागृतीचा प्रयोग करत असतांना ‘साक्षात् प.पू. गुरुदेवच आले आहेत. त्यांच्या चरणांवर मी मस्तक ठेवले आहे. त्यांच्या अंगठ्यातून मला चैतन्य मिळत आहे,’ असे मला जाणवले. मला सहस्रारचक्रावर संवेदना जाणवल्या.

ई. सत्संगाची व्याप्ती समजून घेत असतांना मला पुष्कळ आनंद होत होता.

उ. दुसर्‍या दिवशी दिवसभर मला आनंदावस्था जाणवली.

ऊ. ‘माझे मन आणि शरीर हलके झाले आहे’, असे मला वाटले.’

५. सौ. चंदा पत्की, संभाजीनगर

अ. ‘मला शिबिरात प.पू. गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अस्तित्व अखंड अनुभवता आले.

आ. पहिल्या दिवशी मला मंद सुगंध येत होता. त्यामुळे माझे मन आनंदी झाले.

इ. पडद्यावरील (स्क्रीनवरचे) प.पू. गुरुमाऊलींचे छायाचित्र पहात असतांना ‘त्यांच्या आज्ञाचक्रातून पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले. नंतर मला त्यांच्या ठिकाणी केवळ प्रकाशच दिसत होता.

ई. मला तोंडात मधुर चव जाणवत होती.

उ. ‘शिबिरात मला पुष्कळ आनंद आणि चैतन्य ग्रहण करता आले,’ याबद्दल मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

६. श्रीमती शोभा सुरेश चौधरी, नांदेड

अ. ‘मी शिबिरस्थळी प्रवेश करताच मला चैतन्य जाणवले. माझे मन पुष्कळ हलके झाले आणि मला प्रसन्न वाटले.

आ. शिबिराच्या आरंभी भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना ‘व्यासपिठावर तिन्ही गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) हे सिंहासनावर विराजमान झाले आहेत. ते माझ्याकडे स्मितहास्य करून पहात आहेत,’ असे मला जाणवले. मी व्यासपिठावर जाऊन तिन्ही गुरूंचे चरणदर्शन घेतले. त्यानंतर मी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणांवर माझे मस्तक ठेवले. तेव्हा त्यांच्या कोमल चरणांचा स्पर्श माझ्या आज्ञाचक्रावर झाला.‘तेथून माझ्या संपूर्ण शरिरात गुरुमाऊलींचे चैतन्य प्रक्षेपित होत आहे,’ असे मला जाणवले.’

इ. भावजागृतीचा प्रयोग संपल्यावर मी डोळे उघडल्यावर मला सभागृहात पुष्कळ प्रकाश दिसला. मला ‘सभागृहात पुष्कळ चैतन्य आहे’, असे मला जाणवले.’

७. श्रीमती स्वाती कुलकर्णी, नौपाडा, ठाणे. 

अ. ‘मला आश्रमात सर्वत्र दैवी सुगंध येत होता.

आ. मला सातत्याने ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ’ यांचे अस्तित्व जाणवत होते.

इ. ‘मला त्रास देणार्‍या वाईट शक्तींचे अस्तित्व नष्ट होत आहे. माझ्या भोवती संरक्षककवच निर्माण होत आहे’, याची मला जाणीव झाली.

ई. ‘माझा सूक्ष्मदेह चैतन्याने भारित झाला आहे. माझे मन पुष्कळ सकारात्मक झाले आहे’, असे मला गुरुकृपेने जाणवले.’

८. सौ. जयश्री हट्टे, विश्रामबाग, सांगली. 

अ. ‘शिबिराच्या पहिल्या दिवशी शिबिरात ‘श्री. चेतन राजहंस आणि श्री. चैतन्य तागडे बोलत असतांना मला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होत आहेत. माझे मन आणि शरीर हलके झाले आहे’, असे मला जाणवले.

आ. श्री. चैतन्य तागडे यांनी बोलायला आरंभ केल्यानंतर ‘माझ्यावरील त्रासदायक आवरण दूर होत आहे,’ असे मला जाणवले.

इ. माझे मन सतत निर्विचार स्थितीत होते.

ई. मला दिवसभर पुष्कळ आनंदाची अनुभूती येत होती.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १९.१.२०२६)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक