लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप

पणजी, २८ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे उलटूनही सांगे तालुक्यातील काजूर बाणखाल भागात पूल नसल्याचे समोर आले आहे. येथील ग्रामस्थांना एका सुरक्षित कायमस्वरूपी पुलासाठी गेल्या ४० वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे ग्रामस्थांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत असून याविषयी स्थानिक लोक संताप व्यक्त करत आहेत. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत अनेक आमदार आणि स्थानिक नेते यांना ही समस्या सोडवण्याची विनंती केली होती; मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासने मिळाली असून प्रत्यक्षात कामाला प्रारंभ झालेला नाही. पावसाळ्यात येथील नदीवर असलेला साकव (छोटा पूल) पाण्याखाली जातो आणि गावाचा इतर जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होतात. प्रतिवर्षी ग्रामस्थ लाकडी पूल बनवतात आणि या पुलावरून त्यांची ये-जा चालू असते. स्थानिक पंचायतीच्या सरपंचांनीही या समस्येकडे पाहिले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
याविषयी येथील सरपंच विधी वेळीप यांनी काजूर बाणखाल भागातील रेंगाळलेल्या कामावरून आमदार आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांची नाहक अपकीर्ती करण्याचे जाणीपूर्वक प्रयत्न चालू केल्याचा आरोप केला आहे. या सूत्राविषयी सरपंच विधी वेळीप म्हणाले, ‘‘सदर प्रकल्पाचे काम पुढे न सरकण्यामागे प्रशासकीय कारणे आहेत. आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे या प्रकल्पाची प्रक्रिया थांबली आहे. त्याचप्रमाणे या विषयावर स्थानिक रहिवाशांमध्ये एकमत नसल्याने कामाला विलंब झाला आहे. ही केवळ राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठी खेळली गेलेली खेळी आहे.’’
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !