बंगालमध्ये हिंदु पुनर्जागरणाची आवश्यकता !

‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !

१. बंगालचा वैभवशाली इतिहास

‘बंगाल पुष्कळ गौरवशाली राज्य होते. भारताचा स्वातंत्र्य संग्राम बंगालपासून आरंभ झाला. स्वातंत्र्य संग्रामात बंगाल नेहमीच अग्रेसर होते. बंगालमध्ये जगदीशचंद्र बोस, मेघनाद शहा आणि सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे वैज्ञानिक होऊन गेले. बंगाली भाषेत विपुल प्रमाणात पुरातन वाङ्मय रचण्यात आले आहे. कृत्तीवास ओझा अतिशय लोकप्रिय बंगाली कवी होते. त्यांनी वाल्मीकिरचित संस्कृत रामायणाचा बंगाली भाषेत अनुवाद केला आहे. चित्रकलेच्या क्षेत्रात जेमिनी रॉय आणि अबानिंद्रनाथ टागोर हे विश्व विख्यात चित्रकार होऊन गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महर्षि अरविंद घोष यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान सर्वपरिचित आहे. नोबेल पुरस्कार प्राप्त रविंद्रनाथ टागोर आणि ‘वन्दे मातरम्’ ची रचना करणारे बंकिमचंद्र चॅटर्जी हेही बंगालचेच आहेत.

आध्यात्मिक क्षेत्रात चैतन्य महाप्रभु यांनी ‘हरे कृष्ण’ महामंत्राच्या माध्यमातून एक नवीन आंदोलन उभे केले होते. त्यांनी मुसलमान शासकांच्या विरुद्ध हरे कृष्ण महामंत्राच्या माध्यमातून क्रांती केली. त्यांच्या समवेतच रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या मोठ्या विभूतींनीही मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक क्षेत्रात कार्य केले आहे. मी ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’तून आलो आहे. ‘देशाचा गौरवशाली इतिहास हृदयात जपून ठेवला पाहिजे, तरच आपण योग्य प्रकारे स्वतःचे भविष्य निर्धारित करू शकतो’, असे माझे गुरु नेहमी म्हणायचे. त्याप्रमाणे आम्ही कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत.

२. राष्ट्र-धर्मविरोधी शासनकर्त्यांमुळे बंगालची अधोगती

स्वामी निर्गुणानंद पुरी

सध्या बंगाल त्याचा गौरवशाली इतिहास घालवून बसला आहे. तेथील राष्ट्र आणि धर्म यांविरोधी शासनकर्त्यांमुळे बंगालची अधिकाधिक अवनती होत गेली. समाजाच्या चिंतनाचा स्तरही पुष्कळ खालावला आहे. एकेकाळी बंगालमध्ये मोठा व्यापार होता. बंगाल हा भारतवर्षांत बँकींग यंत्रणेचा पाया रोवणारा ‘पायोनियर’ होता. सध्या बंगालची मोठ्या प्रमाणात लूट झाली आहे. बंगालमधील सर्व युवावर्ग नोकरीसाठी भारतभरात विखुरला गेला आहे. अभ्यासात हुशार असणारी मुले शिकून मोठी होतात. त्यानंतर नोकरीसाठी त्यांना बंगाल सोडून इतर राज्यांमध्ये स्थायिक होणे भाग पडते. अशा प्रकारे पैसे मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंदु तरुणांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे गावांमध्ये म्हातारे आई-वडील किंवा लहान भावंडे उरली असून हिंदूंची गावे ओसाड झाली आहेत. शहरांमध्ये कामाला लागलेली मुले गावातील घर आणि भूमी विकून आई-वडिलांसह तेथेच स्थायिक होतात. अर्थातच त्यांची भूमी धर्मांध खरेदी करतात. अशा प्रकारे गावांमधील भूमी हिंदूंच्या कह्यातून निसटून परधर्मियांकडे जात आहेत. त्यामुळे परत बंगालला वैभवाकडे नेण्यासाठी गावागावांत रोजगाराची निर्मिती होणे आवश्यक आहे.

३. बंगालमध्ये सांस्कृतिक र्‍हास

बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक र्‍हास झाला आहे. साम्यवाद्यांच्या राजवटीत येथील लोक मंदिरात जाणे विसरले आहेत. मंदिरात न गेल्यामुळे धर्माची चर्चा थांबली असून समाजातील दुरावा अधिकच वाढत गेला आहे. पूर्वी बंगालमध्ये सर्वत्र हरि सभा चालायच्या. तेथे येऊन लोक हरिनाम कीर्तन करायचे. ते सर्व हळूहळू बंद होत गेले. आता परत हरि सभांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आता शहरांप्रमाणे गावांतही लोक आत्मकेंद्रीत झाले आहेत. त्यामुळे ते एकमेकांपासून लांब जात आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात राजकारणाचा पगडा आहे. आपण बंगालमध्ये कुठेही गेलो, तर लोक आधी ‘तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात ?’, असे विचारतात. आपण हिंदु कि मुसलमान याच्याशी संबंध नसतो, तर आपण भाजपचे, तृणमूलचे कि साम्यवादी पक्षाचे आहोत ?, हे त्यांना जाणून घ्यायचे असते.

४. साम्यवाद्यांच्या खोट्या कथानकांशी लढा

साम्यवादी प्रतिदिन नवनवीन कथानक निर्माण करत असतात. तेथील आदिवासी, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या लोकांना ते हिंदु नसल्याचे सांगतात. त्यामुळे ते लोक दुर्गाेत्सवात सहभागी होण्याचे टाळतात. त्यावर उपाय म्हणून आम्ही त्यांना आमच्या दुर्गाेत्सवामध्ये आमंत्रित करतो, तसेच आम्हीही त्यांच्या उत्सवात सहभागी होण्याचा प्रयत्न करतो. दुर्गापूजेच्या वेळी काही सामाजिक संघटना गरिबांना नवीन कपडे वितरित करतात. आता आम्ही त्यांच्या उत्सवातही त्यांना नवीन कपडे वितरीत करायचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांना आपल्याविषयी आपुलकी वाटेल आणि कालांतराने ते आपल्यात मिसळून जातील. आताची लढाई ही केवळ अस्त्रशस्त्राने लढली जात नाही, तर खोट्या कथानकांद्वारे (‘नॅरेटिव्ह’द्वारे) लढली जाते. त्यामुळे आपल्यालाही खोट्या कथानकांना प्रत्युत्तर दिले पाहिजे. आता हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी स्वतःचा शत्रू ओळखायला शिकले पाहिजे, संघटन केले पाहिजे आणि साधना करून आत्मबलसंपन्न झाले पाहिजे.’

–  स्वामी निर्गुणानंद पुरी, कोषाध्यक्ष, इंटरनॅशनल वेदांत सोसायटी, कोलकाता.